Thursday, July 2, 2026

Mayor Ritu Tawde : नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, महापौरांचा कठोर इशारा

Mayor Ritu Tawde : नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, महापौरांचा कठोर इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : साकीनाका येथील खैरानी मार्गावर खुल्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख (वय ५५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी २ जुलै २०२६ रोजी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेच्या स्थळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भेट दिली. त्यानंतर, राजावाडी रुग्णालयात जाऊन असलम शेख यांच्या कुटुंबीयांची महापौरांनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. नागरिकांच्या जीवावर बेतणारी कोणतीही कृती मी कदापि सहन करणार नाही. सार्वजनिक ठिकाणी काम करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उघड्या मॅनहोलमुळे निष्पाप नागरिकाने जीव गमावणे, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

महापौरांच्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ कठोर पाऊल उचलले आहे. सकृतदर्शनी, या मॅनहोलच्या ठिकाणी सुरक्षिततेची योग्य काळजी न घेतल्यामुळे बेजबाबदार पद्धतीने कामाची अंमलबजावणी केल्याबद्दल चार अधिकाऱ्यांना चौकशीसापेक्ष त्वरित निलंबित करण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे यांनी नमूद केले की, पावसाळापूर्व तयारीच्या विविध बैठकींमध्ये दोन बाबींवर मी स्वतः प्रामुख्याने भर दिला होता. मुंबईतील सर्व मॅनहोलची झाकणे सुस्थितीत असली पाहिजेत आणि व्यवस्थित लावलेली हवीत. त्याचप्रमाणे सर्व झाडांचे योग्य सर्वेक्षण करून त्यांची स्थिती तपासावी, आवश्यक तेथे फांद्यांची छाटणी करावी आणि वृक्ष उन्मळण्याची जराही शक्यता वाटली तरी तत्काळ संरक्षक उपाययोजना कराव्यात. माझ्यासह उपमहापौर, इतर पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनीही सातत्याने बैठका घेतल्या होत्या आणि सर्व सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. नाले स्वच्छता तसेच रस्ते कॉंक्रिटीकरण व इतर कामांकरिता प्रत्यक्ष दौरे करतानाही या सूचना वारंवार केल्या होत्या. असे असतानाही अंमलबजावणी योग्य होत नसेल, तर यापुढेही दोषी अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे महापौरांनी नमूद केले.

महापौर रितू तावडे पुढे म्हणाल्या की, आजही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असताना खैरानी रस्त्यावरील सदर मॅनहोल खुले करण्याचे कोणतेही कारण नव्हते. कामे करताना तेथे किमान संरक्षक उपाययोजना करणे गरजेचे होते. नागरिकांच्या जीवावर बेतणारी कोणतीही कृती मी कदापि सहन करणार नाही. सार्वजनिक ठिकाणी काम करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उघड्या मॅनहोलमुळे निष्पाप नागरिकाने जीव गमावणे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. या दुर्घटनेप्रकरणी पुढील ७ दिवसांत अंतिम चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे महापौरांनी नमूद केले. खैरानी रस्त्यावरील पाहणीनंतर महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात जाऊन मृत असलम शेख यांचे सुपुत्र, भाऊ, वहिनी आणि इतर कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेख कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची तत्काळ मदत प्रदान करण्यात येणार असल्याचे महापौर तावडे यांनी यावेळी जाहीर केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा