Wednesday, July 1, 2026

Chembur Bus Accident : चेंबूरमधील झाड दुघर्टनेेचे स्थायी समितीत तीव्र पडसाद

Chembur Bus Accident : चेंबूरमधील झाड दुघर्टनेेचे स्थायी समितीत तीव्र पडसाद

उद्यान अधिकारी, रस्ते अभियंता आणि सहायक आयुक्तांना निलंबित करा

त्रयस्थ व्यक्ती मार्फत चौकशी करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : चेंबूरमधील पिंपळाचे विशाल झाड शाळेच्या बसवर कोसळून एका विद्यार्थ्यांचा मुलाच्या मृत्यूचा तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. रस्ते कामांमध्ये येथील झाडे मुळासकट उपटून काढल्याची बाब उद्यान विभागाने लक्षात आणून दिल्यानंतरही त्या पत्राची दखल न घेतल्याने रस्ते अभियंता, तसेच विभागाचा उद्यान अधिकारी तसेच विभागाचा सहायक आयुक्त यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात यावे असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले. तसेच या प्रकरणाची त्रयस्थ व्यक्तीमार्फत चौकशी करण्यात यावी असेही निर्देश शिंदे यांन बुधवारी पार पडलेल्या सभेत दिले. (Chembur Bus Accident)

मुंबई महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी चेंबूर येथे झाड युनिव्हर्सल शाळेच्या बसवर कोसळून विहान श्रीवास्तव या ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चार विद्यार्थी जखमी झाले आहे. या घटनेतील ११ वर्षीय मुलाला श्रध्दांजली वाहण्यासाठी सभागृहनेते गणेश खणकर यांनी शोक प्रस्ताव मांडला. या शोक प्रस्तावावर बोलतांना खणकर यांनी ही घटना दुर्दैवी असून रस्ते कामांमध्ये झाडांची मुळेच उखडून टाकण्यात आली आहेत. रस्त्याचा विकास करताना या झाडांच्या मुळांवर घाला घालण्यात आला. या उन्मळून पडलेल्या झाडाबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ते विभागाच्या अभियंत्याला पत्र लिहून याची गंभीरता लक्षात आणून दिली होती. त्यानंतर या पत्रावर दीड वर्ष झाले तरी उत्तर देण्याची तसदी रस्ते विभागाच्या अभियंत्याने दाखवली नाही. किंवा त्यांचा संवादही झाला नाही. त्यामुळे झाडांची कत्तल सर्रास झाली. पण उदयान विभागाने वस्तूस्थिती लक्षात आणून दिल्यांनतरही रस्ते अभियंत्याने दखल घेतली नाही तर याची दखल काळाने घेतली आणि यात एका मुलाचा जीव गेला. त्यामुळे याला जे म्हणून कोणी जबाबदार आहेत, मग रस्ते अभियंता असेल, उद्यान अधिकारी असेल तर सहायक आयुक्त असेल त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे आणि अहवाल येईपर्यंत कामावर घेवू नका, तसेच त्यांची एक पदोन्नती रोखा अशी मागणी केली.

यावर बोलतांना उबाठाचे यशोधर फणसे यांनी केवळ रस्त्यालगतच्या झाडांचा धोका नाही तर उद्यानातील झाडेही धोका झाली आहेत,असे सांगत आता धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्या छाटण्यासाठी सल्लागार नेमण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे यांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी केली. तर शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी झाडांची मुळे रस्ते कामांमध्ये उखडली गेल्याने याप्रकरणांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच नव्याने बनवलेल्या सर्वच रस्त्यालगतच्या झाडांचा सर्वे करण्यात यावा अशीही सूचना केली. शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी आपल्या विभागातील चार घटना सांगून झाडांच्या पडझडीकडे आणि त्याबाबतच्या दुर्लक्षाकडे समितीचे लक्ष वेधले.तसेच माटुंगा येथील एका शाळेच्या जवळ एका झाडाला धोकादायक असल्याचा फलक लावला आहे. पण हे झाड कापले जात नसून तिथून शाळेच्या बस आणि मुले जात असतात. त्यामुळे या झाडामुळे अशीच घटना भविष्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नसून प्रशासनाचा मात्र याकडे लक्ष नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच खासगी सोसायटीच्या आवारातील झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेने करून मालमत्ता कराच्या देयकातून याची वसूली करण्याचीही सूचना त्यांनी केली.

आपल्याला जीवनदान देणारी झाडेच आता आपले जीव घेवू लागले आहेत. जीवन रक्षकच आता भक्षकच बनले असून मुंबईत जी ३३ लाख झाडे आहेत ती कशी सुरक्षित राहतील याची काळजी घ्यायला हवी आणि चेंबूरच्या दुघर्टनेल जबाबदार असलेल्या संबंधितांवर कडक कारवाई व्हायला हवी अशी सूचना केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी झाडांप्रमाणे संरक्षक भिंतीही सुरक्षित नसून त्यांचे ऑडीट करण्याचे तसेच पावसाळ्याप्रमाणे झाडे आणि तिवरांच्या झाडांची काळजी घ्यायला हवी असे सांगितले. तर जमीर कुरेशी यांन सन २०१२ पासून झाडांमुळे ५४ जणांचा मृत्यू झाला असून ४२२ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे झाड पडून जर मुलाचा बळी गेला असेल तर संबंधित कंत्राटदाराला अकरा पटीने दंड आकारायला हवा अशी सूचना केली. तसेच रस्ते कामांमध्ये ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे, पण जे २५ टक्के काम शिल्लक आहे, त्यातील झाडे वाचवण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना केली. प्रकाश दरेकर यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधितांवर दाखल करण्याची सूचना केली. तर तेजिंदर सिंग तिवाना यांनी रस्ते कामांमध्ये झाडांची मुळे कापली गेली. याला उद्यान विभागच नाही तर रस्ते अभियंता जबाबदार आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे करताना झाडांभोवतीच्या परिसरात जेसीबीचा वापर करू नये अशी सूचना केली. तसेच स्वतंत्रपणे वृक्ष सुरक्षा परिक्षणक केले जावे अशी मागणी केली.

श्रध्दा जाधव यांनी झाडांच्या भोवती २ बाय २ मीटरची जागा मोकळी ठेवणे आवश्यक असतानाही ती ठेवली जात नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. तर प्रिती सातम यांनी दुघर्टन झाल्यांनतर शोक व्यक्त करण्याऐवजी मुंबईत अशाप्रकारे संभाव्य दुघर्टना असलेल्या ठिकाणांचे सखोल ऑडीट करणे आवश्यक असल्याची सूचना केली.यावर समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याचे दायित्व निश्चित करण्यासाठी ही तहकूबी मांडण्यात आली असून याची तज्ज्ञ व्यक्ती मार्फत त्रयस्तपणे चौकशी केली जावी असे निर्देश प्रशासनाला दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत राखी जाधव, हरिष भांदीर्गे, मिनाक्षी पाटणकर, मकरंद नार्वेकर, तुलिफ मिरांडा आदींनी भाग घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >