Tuesday, June 30, 2026

BMC News : तलाव क्षेत्रात पावसाची गैरहजेरी; मुंबईकरांच्या चिंतेत वाढ

BMC News : तलाव क्षेत्रात पावसाची गैरहजेरी; मुंबईकरांच्या चिंतेत वाढ

- आणखी पाच टक्के कपात पुढील आठवडयापासून ?

मुंबई (सचिन धानजी)

मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये अद्यापही पाण्याचा शिडकावा पडला नसून यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत अजुनही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात न पडणाऱ्या पावसामुळे आता मुंबईकरांना येत्या आठवड्यापासून पाच टक्के अधिकच्या पाणी कपातीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३० जुन पर्यंतच्या पावसावर पुढील कपातीचा निर्णय घेतला जाईल असे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार अद्यापही तलाव क्षेत्रात समाधानकार पावसाची हजेरी न लागल्याने मुंबईकरांना सध्याच्या दहा टक्के कपातीच्या तुलनेत अधिक पाच टक्के कपात वाढवली जावून १५ टक्क्यांपर्यंत कपात लागू केली जाण्याची दाट शक्यता आहे. (BMC News)

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा,मध्य वैतरणा आणि भातसा या नगरबाह्य धरणांमध्ये अद्यापही पाऊस पडत नसून रविवारी सकाळपर्यंत अप्पर वैतरणा, तानसा परिसर कोरडा तर मोडकसागर, मध्य वैतरणा आणि भातसा क्षेत्रात ५ ते १८ मि.मी एवढाचा पाऊस पडला गेला. तर मुंबईतील विहारमध्ये ४५.१३ मि.मी आणि तुळशी तलाव क्षेत्रात २४.२६ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. (BMC News)

नगरबाह्य धरणांमधील मोडक सागर धरणामध्ये आतापर्यंत एकूण ३८ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली. तर सर्व धरणांमध्ये चार ते पाच मि.मी एवढ्याच एकूण पावसाची नोंद झाली आहे. तर विहारमधील एकूण पावसाची ११२ मि.मी आणि तुळशी तलाव क्षेत्रातील एकूण पावसाची १७९ मि.मी एवढी आहे. (BMC News)

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमध्ये ६.९३ टक्के एवढा पाणी साठा असून मागील वर्षी याच कालावधीमध्ये ३९.५० टक्के एवढा पाणी साठा होता, तर त्याआधीच्या म्हणजे सन २०२४मध्ये याच कालावधीमध्ये ५.४३ टक्के एवढा पाणी साठा होता. मुंबईला दरवर्षी एकूण १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यातुलनेत सोमवार २९ जून २०२६ पर्यंत पाण्याचा एकूण साठा हा १ लाख २७९ दशलक्ष लिटर एवढा आहे. (BMC News)

तलावातील पाणी साठा कमी झाल्याने भातसामधून १४७ एमसीए आणि वैतरणातून ९० एमसीए अशाप्रकारे २३७ एमसीए एवढा निभावणी साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी मिळावी आहे. त्यामुळे उपलब्ध साठा आणि निभावणी साठ्यामधील पाणी वापरले जात असून हा एकूण साठा आता दहा टक्के पाणी कपात केल्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा आहे. मात्र, ३० जुनपर्यंतच्या पावसाचा आढावा घेवून पुढील पाणीकपातीचा संदर्भात आढावा बैठक घेवून निर्णय घेतला जाईल,असे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे २९ जुन पर्यंत पावसाचा थेंबही तलाव क्षेत्रात पडत नसल्यामुळे कपात वाढवण्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय नसून अजुन सध्याच्या दहा टक्के कपातीमध्ये अजुन पाच टक्के कपात वाढवण्याचा विचार प्रशासन करत आहे. एकूण १५ टक्क्यांच्या पुढे कपात लागू करण्यास मर्यादा असल्यामुळे यापेक्षा अधिक वाढ कपातीमध्ये केली जाणार नाही. कपात वाढवणे हे आवश्यक असले तरी प्रत्यक्षात अनेक शेवटच्या ठिकाणांवर आणि उंचावर पाणी योग्य दाबाने पोहोचले जाणार नाही आणि यामुळे समस्या अधिक वाढेल, याकरता पाच टक्के कपात वाढवण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती मिळत आहे. (BMC News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >