Monday, June 29, 2026

Mumbai Rain : हवामान विभागाचा 'रेड अलर्ट', मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : हवामान विभागाचा 'रेड अलर्ट', मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, पुढील काही दिवस मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहणार आहेत.

पालघर जिल्ह्यात २९ जून रोजी 'अत्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर १ ते ३ जुलै दरम्यानही येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये सोमवरपासून पुढील ५ दिवस 'मुसळधार ते अतिमुसळधार' पावसाची शक्यता आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. रायगड जिल्ह्यातही ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, २ जुलै रोजी काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी प्रवास करताना आणि घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत.

लातूरकरांना दिलासा : लातूर जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रेणापूर तालुक्यात सर्वाधिक २९.७ मिलीमीटर, तर देवणी तालुक्यात सर्वात कमी १.२ मिलीमीटर पाऊस झाला. लातूरमध्ये २१.७, चाकूरमध्ये २१.०, उदगीरमध्ये १६.२, जळकोटमध्ये १५.७, अहमदपूरमध्ये १४.४, शिरूर अनंतपाळमध्ये १३.३, औसामध्ये ६.० आणि निलंग्यात १.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अनेक भागांत अद्याप पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पंढरपुरातही दमदार हजेरी : पंढरपूर तालुक्यातील चळे आंबे ओझेवाडी या परिसरात पहाटेपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नदीकाठच्या परिसरातील अनेक ओढ्या नदी नाले वाहू लागले असून अनेक शेतांमधून देखील आता पाणी उभारायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात शेत शिवार सह सर्वत्र पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळालेला दिसून येतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >