Thursday, June 25, 2026

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 'एसआयटी' वादाच्या भोवऱ्यात

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 'एसआयटी' वादाच्या भोवऱ्यात

- तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी दिलेल्या आदेशांवर विरोधकांनी घेतला आक्षेप

मुंबई : पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder Case ) याच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश गुरुवारी विधानसभेत तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी सरकारला दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे या हत्याकांडाकडे सभागृहाचे लक्ष वेधत कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, तालिका अध्यक्षांनी दिलेल्या या निर्देशांवर उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत तालिका अध्यक्षांच्या कायदेशीर अधिकारांवरच सवाल उपस्थित केला. त्यानंतर, या प्रकरणाची चौकशी 'एसआयटी'मार्फत करायची की नाही, याचा अंतिम निर्णय आता विधानसभा अध्यक्ष घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यातील २६ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल याचा १८ जून रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा निव्वळ अपघात असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता मंगळवारी धक्कादायक वास्तव समोर आले. केतन अग्रवाल यांची वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचला होता. १८ जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्याच्या परिसरातील एका खोल दरीत केतनला दोघांनी मिळून ढकलून दिले होते. पोलिसांनी या दोन्ही मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना आमदार सुनील शेळके म्हणाले, "केतन अग्रवालच्या कुटुंबाला सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगून फसवण्यात आले. परंतु, पोलिसांच्या तपासात फोन कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांवरून ही पूर्वनियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी सिया गोयल हिचे इतर मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी अग्रवाल कुटुंबापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली. त्यामुळे या हत्येच्या कटात मुलीच्या कुटुंबाचाही हात असण्याची शक्यता असून, त्यांनाही या गुन्ह्यात सह-आरोपी करण्यात यावे," अशी मागणी शेळके यांनी केली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी या खटल्याची सुनावणी 'फास्ट ट्रॅक' कोर्टात चालवावी, अशी विनंतीही त्यांनी राज्य सरकारला केली.

सभागृहात काय घडले?

आमदार सुनील शेळके यांनी मांडलेली बाजू ऐकून घेतल्यानंतर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी सरकारला या प्रकरणाची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले. मात्र, तालिका अध्यक्षांच्या या घोषणेनंतर विरोधी बाकांवरील उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, "तालिका अध्यक्षांना सभागृहात असे थेट एसआयटी चौकशीचे आदेश देण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? कारण यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी तालिका अध्यक्षांचे असे आदेश बदलल्याचे अनेक दाखले आहेत." जाधव यांच्या या आक्षेपानंतर, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षच घेतील, असे जाहीर करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा