Thursday, June 25, 2026

Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर थरारक प्रसंग! एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने आली समोरासमोर; मोठा अपघात टळला

Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर थरारक प्रसंग! एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने आली समोरासमोर; मोठा अपघात टळला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर बुधवार २४ जून रोजी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन विमाने टॅक्सीवेवर एकमेकांसमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा आणि वैमानिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही विमाने वेळेत थांबवण्यात आली आणि संभाव्य अपघात टळला. (Ahmedabad Airport)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून अहमदाबादला आलेले एअर इंडियाचे एआय-२४९३ हे विमान लँडिंगनंतर पार्किंग बेकडे जात असताना अनवधानाने चुकीच्या दिशेने वळले. याचवेळी इंडिगोचे एक विमान उड्डाणासाठी टॅक्सीवेवर पुढे सरकत होते. परिणामी, दोन्ही विमाने एकाच मार्गावर समोरासमोर आली. घटनेची माहिती मिळताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने तातडीने हस्तक्षेप केला. दोन्ही विमानांना सुरक्षित अंतर राखून थांबण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे कोणतीही धडक न होता परिस्थिती नियंत्रणात आली. (Ahmedabad Airport)

या घटनेबाबत एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, "२४ जून रोजी मुंबईहून अहमदाबादला आलेल्या एआय-२४९३ विमानाने लँडिंगनंतर टॅक्सींग करताना चुकून चुकीचे वळण घेतले होते. मात्र, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाला नाही." (Ahmedabad Airport)

एअर इंडियाने पुढे सांगितले की, संबंधित विमान नंतर टोइंग वाहनाच्या मदतीने सुरक्षितपणे त्याच्या निर्धारित पार्किंग बेमध्ये नेण्यात आले. तसेच घटनेची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याची माहितीही कंपनीने दिली. (Ahmedabad Airport)

दुसरीकडे इंडिगो एअरलाइननेही या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, "दोन्ही विमाने सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या विमानाला मार्ग मोकळा करून देण्यात आला आणि आमच्या विमानाने नियोजित उड्डाण पूर्ण करत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले."

इंडिगोने यासंदर्भातील माहिती तत्काळ संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. विमानवाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, टॅक्सीवेवरील अशा घटना दुर्मीळ असल्या तरी त्या गंभीर स्वरूपाच्या मानल्या जातात. कारण विमानांच्या हालचालींसाठी वापरल्या जाणाऱ्या या मार्गांवर अत्यंत अचूक समन्वय आवश्यक असतो. अशा परिस्थितीत एअर ट्रॅफिक कंट्रोल, ग्राउंड स्टाफ आणि वैमानिकांची सतर्कता महत्त्वाची ठरते. (Ahmedabad Airport)

दरम्यान, या घटनेमुळे काही काळ विमानतळावरील हालचालींवर परिणाम झाला असला तरी कोणतीही जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान झाले नसल्याने प्रवासी आणि विमान कंपन्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून सविस्तर चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. (Ahmedabad Airport)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा