Thursday, June 25, 2026

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

'तो संकेत मी दिला' अन् सियाच्या जबाबामुळे तपासाला नवे वळण

पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात आता नवे आणि धक्कादायक वळण समोर आले आहे. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांनी आता एकमेकांवरच हत्येचा ठपका ठेवण्यास सुरुवात केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. (Ketan Agrawal Murder Case)

पोलिसांच्या चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी स्वतःची भूमिका कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असून, गुन्ह्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

केतनला मारण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी 

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चेतन चौधरीने पोलिसांना सांगितले की तो सियासोबत नवीन आयुष्य सुरू करण्याच्या विचारात होता. मात्र केतनचा कायमचा काटा काढण्याचा आग्रह सियानेच धरला होता. दुसरीकडे सिया गोयलने पोलिसांना दिलेल्या जबाबात केतनच्या हत्येचा संपूर्ण कट चेतननेच रचल्याचा दावा केला आहे. तसेच १४ जून रोजी केतनला मारण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चेतन रडल्याचेही तिने सांगितले आहे.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा तपशील समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लोहगड किल्ल्यावर हत्येच्या दिवशी वापरण्यासाठी एक पूर्वनियोजित संकेत ठरवण्यात आला होता. चौकशीत सियाने कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला असून, ती खाली वाकली होती आणि तोच चेतनसाठी ठरलेला संकेत होता. त्यानंतर चेतनने केतनला दरीत ढकलल्याचा आरोप तिने केला आहे. या संकेताबाबत दोघांमध्ये आधीच सहमती झाली होती, असेही तपासातून उघड झाल्याचे सांगितले जात आहे.

तपासात असेही समोर आले आहे की आरोपींनी यापूर्वी लोहगड किल्ल्याची पाहणी केली होती. परिसराची माहिती घेऊन हा भाग गुन्ह्यासाठी योग्य असल्याचे त्यांनी निश्चित केल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच सिया आणि चेतन अनेक महिन्यांपासून सातत्याने संपर्कात होते. दोघांमध्ये २ हजारांहून अधिक फोन कॉल झाले असून, त्यांनी एकूण सुमारे २३८ तास संवाद साधल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

दरम्यान, चेतन चौधरीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. चेतनचे वडील बाबूलाल चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, चेतनने केतनला ढकलले नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, घटना घडली तेव्हा तो केतनपासून दूर उभा होता आणि सिया केतनच्या जवळ होती.

चेतनचे काका उदयराम चौधरी यांनीही चेतन पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्याला या प्रकरणात खोटेपणाने अडकवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांच्या मते, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात प्रेमसंबंध होते. याच कारणातून त्यांनी केतन अग्रवाल याला संपवण्याचा कट रचला. सियाचा विवाह याच वर्षाच्या अखेरीस केतनशी होणार होता. अंतिम घटनेपूर्वीही केतनला मारण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. केतन आणि सिया यांचा बाली दौरा केतनचा पासपोर्ट अचानक गायब झाल्यामुळे रद्द झाला होता. या घटनेकडेही पोलिस व्यापक कटकारस्थानाचा भाग म्हणून पाहत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, सियाने वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने केतनला लोहगड किल्ल्यावर जाण्यास प्रवृत्त केले. त्याचवेळी चेतन स्वतंत्रपणे तेथे पोहोचला होता. त्यानंतर दोघांनी मिळून कट राबवला आणि केतन दरीत कोसळला, असा पोलिसांचा आरोप आहे.

मात्र, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे. सध्या पोलिस विविध पुरावे, कॉल रेकॉर्ड, डिजिटल माहिती आणि आरोपींचे जबाब यांची पडताळणी करत आहेत.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा