Sunday, June 21, 2026

Weather Alert : मान्सूनची प्रतीक्षा कायम! महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, अनेक भागांत वादळी पावसाचा इशारा

Weather Alert : मान्सूनची प्रतीक्षा कायम! महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, अनेक भागांत वादळी पावसाचा इशारा

जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता आणि दमट हवामानाचा त्रास वाढला असून शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील रखडल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार 22 ते 23 जूननंतर कोकण आणि काही भागांत मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon)

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असून काही भागांत 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही उकाड्याचा प्रभाव कायम आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असली तरी जोरदार पावसाची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. हवामान विभागाच्या मते 23 जूननंतर पुणे परिसरात मान्सून सक्रिय होऊ शकतो.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही तापमान वाढलेले असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

दरम्यान, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे.

मान्सूनला अद्याप पूर्ण वेग मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील नागरिक आणि शेतकरी आता मान्सूनच्या पुढील हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >