Wednesday, June 17, 2026

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची वाटचाल ठप्प! महाराष्ट्रात आणखी काही दिवस उकाड्याचा तडाखा; मुंबईकरांना पावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची वाटचाल ठप्प! महाराष्ट्रात आणखी काही दिवस उकाड्याचा तडाखा; मुंबईकरांना पावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई : राज्यभरात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. नैऋत्य मोसमी पावसाची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांना उष्णतेच्या लाटा आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरात विकसित होत असलेल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचा वेग कमी झाला असून जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

मान्सूनची पुढची वाटचाल रखडली :

गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती जवळपास ठप्प झाली आहे. सध्या मान्सूनची रेषा कोकणातील हर्णे ते सोलापूर या पट्ट्यातच स्थिरावली असून पुढील काही दिवस त्यात विशेष बदल होण्याची शक्यता कमी आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, 25 जूननंतर मान्सूनला पुन्हा गती मिळू शकते. (Maharashtra Monsoon Weather Alert)

राज्यातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा :

हवामान विभागाने 19 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा आणि दमट हवामानाचा इशारा जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

18 आणि 19 जूनलाही उकाडा कायम :

18 आणि 19 जून रोजीही मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी परिसरात दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि अकोला जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू शकतो. (Maharashtra Monsoon Weather Alert)

मान्सून का मंदावला?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून कमकुवत होण्यामागे समुद्रातील आर्द्रतेचा अभाव कारणीभूत नसून वरच्या वातावरणातील वाऱ्यांच्या असामान्य रचनेचा परिणाम आहे. पश्चिमी जेट स्ट्रीम नेहमीपेक्षा अधिक दक्षिणेकडे सरकल्याने मान्सूनला पुढे नेणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुरेशी आर्द्रता असली तरी मान्सूनला आवश्यक चालना मिळत नसल्याने त्याची प्रगती मंदावली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

मुंबईत पाऊस कधी?

मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे जूनच्या अखेरीस मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 25 जून ते 1 जुलै या कालावधीत मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते. त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र राज्यातील नागरिकांना उष्णता, दमट वातावरण आणि पावसाच्या प्रतीक्षेचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >