Tuesday, June 16, 2026

Byculla BMC School : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गौरवोद्गार

Byculla BMC School : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गौरवोद्गार

- भायखळा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

शाळा ही केवळ शिक्षण घेण्याची जागा नसून ती मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे, त्यांच्यात संस्कार रुजविण्याचे आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र असते. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद असल्याचे उद्गार माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी काढले.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील महानगरपालिका शाळा संकुलात प्रवेशोत्सव सोहळा आणि शालेय साहित्य वितरण सोमवारी १५ जून २०२६ रोजी पार पडले. यावेळी माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते.

शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, राज्य प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा अभियान) संजय यादव, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, ई विभागाचे सहायक आयुक्त आनंद कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कीर्तीवर्धन किरीतकुडवे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सोहळ्यास उपस्थित होते.

दरम्यान, घाटकोपरमध्ये पालकमंत्री (मुंबई उपनगरे) आशिष शेलार, महापौर रितू तावडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलेल्या विकसित भारताच्या स्वप्नांची पूर्तता करण्यात हीच मुले सर्वांत मोलाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, संस्कारांसाठी आणि शिक्षणासाठी कार्य करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन दप्तर, नवीन पुस्तके, नवीन वह्या, रंगीबेरंगी शालेय साहित्य आणि नवीन पाण्याची बाटली मिळाली. नवीन पुस्तकांचा सुगंध आणि नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहाच्या आठवणी अमूल्य असतात. शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या विकासाचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वांत सक्षम आणि संसाधनसंपन्न महानगरपालिका आहे. महानगरपालिकेच्या शाळा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. यासोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने शाळांमध्ये संगीत आणि योग शिक्षणाला अधिक प्रोत्साहन द्यावे. संगीत मन अधिक संवेदनशील बनवते, तर योग शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत करतो, असे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. महानगरपालिका आठ भाषांमधून शिक्षण देते. शिक्षणासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होता, सोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीही मोलाची मदत होते. महानगरपालिकेच्या सर्व शाळा मिळून यावर्षी ३५ हजार नवीन विद्यार्थी प्रवेश झाल्याची माहिती त्यांनी दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे क्षेत्र आता खुले झाले आहेत. त्यामुळे आव्हाने वाढली असली तर महानगरपालिकेच्या शाळांमधील मुले या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिका चांगल्या आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजेश्री शिरवडकर यांनी प्रास्ताविकात शाळा प्रवेशोत्सवाची तयारी, शालेय साहित्य वाटपांबाबतची माहिती दिली. महानगरपालिकेच्या शाळांवर पालकांचा विश्वास असल्यामुळेच विद्यार्थी संख्या वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अतिरिक्तआयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी आभार मानले.

प्रवेशोत्सव सोहळ्यात विद्यार्थ्यांना माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते २७ प्रकारच्या शालेय साहित्याचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. तसेच गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यासोबतच राज्यपाल महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनही देण्यात आले. शाळा प्रवेशोत्सवात राज्यपाल यांनी शाळेतील वर्गखोल्यांनाही भेट दिली.

पालकमंत्री शेलार, महापौर तावडे यांच्या उपस्थितीत घाटकोपरमध्येही प्रवेशोत्सव :

राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, स्थानिक आमदार पराग शाह, स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर (पूर्व) स्थित पंतनगर महानगरपालिका शाळा संकुल क्रमांक ३ येथे शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विविध विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वितरण करण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी सायली सुर्वे यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >