बाधित झाडांच्या तुलनेत एमएमआरडी लावणार ७६६६ झाडे
मुंबई (सचिन धानजी)घाटकोपर ते मुलंंडमधील मुंबई महापालिकेच्या 'एन', 'एस' आणि 'टी' विभाग कार्यालयाच्या हद्दीतील छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे पर्यंत प्रस्तावित पूर्व मुक्त मार्गाच्या( ईस्टर्न फ्रि वे) विस्तारकामात तब्बल ७०६ झाडे बाधित होत असून यातील ३२० वृक्ष कापणे व ३८६ वृक्ष पुनर्रोपित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये १४९ पिंपळ झाडांचा समावेश असून ही सर्व पिंपळाची झाडे पुनर्रोपित करण्यात येत आहे.
'एन', 'एस' आणि 'टी' विभाग क्षेत्रातील छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे पर्यंत प्रस्तावित पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारकाम प्रस्तावित असलेल्या ठिकाणी एकूण १३३१ वृक्ष अस्तित्वात असून, त्यापैकी सदर कामात बाधित होत असलेले २१८ वृक्ष कापण्यास व ४०३ वृक्ष पुनर्रोपित करण्यास अशी एकूण ६२१ वृक्ष काढण्यात येणार होती. परंतु या मार्गाच्या बांधकाम आराखड्यात बदल झाल्यानंतर एमएमआरडीएने केलेल्या दाव्यानंतर यामध्ये बदल झाला आहे. परंतु यामध्ये पुन्हा बदल झाला आहे. आणि वृक्षांच्या यादीप्रमाणे या प्रस्तावित असलेल्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या एकूण १६५५ वृक्षांपैकी ७०६ वृक्ष प्रस्तावित पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारकामात बाधित होत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या झाडांच्या संख्येत ३२४ने वाढ झाली आहे. तर बाधित झाडांच्या तुलनेत ८५ झाडांनी वाढ झाली आहे.
तब्बल ८२ आक्षेप नोंदवले गेले होते
एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार महापालिकेच्या 'एन', 'एस' आणि 'टी' विभागातील छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे पर्यंत प्रस्तावित पूर्व मुक्त मार्गाच्या नियोजित विस्तारकामात बाधित होणा-या ७०६ वृक्षांपैकी ३२० वृक्ष कापणे व ३८६ वृक्ष पुनर्रोपित करण्यात येणार व व या जागेवरील उर्वरित ९४९ वृक्ष आहे,ती तिथेच आहे तशीच राखली जाणार आहेत.
या प्रकल्पाच्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या एकूण १६५५ वृक्षांच्या तुलनेत बाधित होणाऱ्या ७०६ वृक्षांपैंकी घाटकोपरमधील एकूण ५८१ वृक्षांपैकी काही वृक्ष कापणे आणि बाधित होण्याच्या झाडांबाबत ८२ आक्षेप / सूचना प्राप्त झाल्या होत्या.
करिवली गावात ७६६६ झाडे नव्याने लावणार
एम.एम.आर.डी.ए. मार्फत वृक्षाचे पुनर्रोपण व नवीन लागवड केली जाणार आहे, ग्रामपंचायत करिवली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्वेक्षण क्रमांक १६४, १७२ आणि. ५९ अशी असून, ठिकाणी वृक्ष पुनर्रोपण व नविन वृक्ष लागवडीकरीता अंदाजे २३,७५० चौ.मी एवढे क्षेत्र उपलब्ध आहे. या ३२० वृक्ष कापण्याच्या व ३८६ वृक्ष पुनरोपित करण्याच्या बदल्यात नवीन लावण्यात येणारी ७६६६ वृक्ष तोडण्यात आल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांत लावण्यात येणार आहेत व या नवीन लावण्यात येणा-या झाडांची उंची ०६ फुटापेक्षा कमी नसेल तसेच नव्याने लागवड करण्यात देणारी वृक्ष स्थानिक प्रजातीची असतील. नवीन लावण्यात आलेल्या झाडांचे ०७ वर्षापर्यंत जतन व संवर्धन संबंधित अर्जदार कार्यकारी अभियंता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणयांच्यामार्फत करण्यात येईल, असे हमीपत्र एमएमआरडीएने दिले आहे.
या विस्तारीत ईस्टर्न फ्रि वे प्रकल्पाची वैशिष्ट्ये
प्रकल्प मार्गाची लांबी : १३.९० किलोमीटरचे
प्रकल्प कामाच्या मार्गिका : सहा, हाय स्पीड कॉरिडॉर
मुुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे २ पदरी अप डाऊन रॅम्प
मुंबई आणि ठाणे दरम्यानचा वाचणारा प्रवासाचा वेळ : २५ ते३० मिनिटे






