Tuesday, June 16, 2026

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची मुंबईकरांना प्रतीक्षाच! २० जूनपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीचं संकट गडद

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची मुंबईकरांना प्रतीक्षाच! २० जूनपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीचं संकट गडद

मुंबई : मुंबईकरांना यंदा मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारणपणे ७ ते ८ जूनदरम्यान मुंबईत दाखल होणारा मान्सून १५ जून उलटल्यानंतरही शहरापासून दूरच आहे. त्यामुळे उष्णता, वाढलेली आर्द्रता आणि पाणीटंचाईच्या संभाव्य संकटामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

मान्सूनने काही दिवसांपूर्वी तळकोकण आणि रत्नागिरी गाठले होते. त्यामुळे लवकरच मुंबईतही पावसाचे आगमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर मान्सूनची प्रगती मंदावली असून त्याच्या वाटचालीला तात्पुरता ब्रेक लागल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ते २० जूनदरम्यान दक्षिण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून त्यानंतरच तो मुंबईकडे सरकू शकतो. (Maharashtra Monsoon Weather Alert)

दरम्यान, पावसाच्या अनुपस्थितीमुळे मुंबईतील उकाडा कायम आहे. सोमवारी सांताक्रूझ येथे ३५.२ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.१ आणि ३.५ अंशांनी अधिक होते. किमान तापमानात काहीशी घट झाली असली तरी हवेतील ६० ते ७० टक्के आर्द्रतेमुळे नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारीही हवामानात विशेष बदल होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

मान्सूनच्या उशिरामुळे आता मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबतही चिंता वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा हळूहळू कमी होत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास ही कपात वाढवून २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

महापालिका प्रशासनाकडून धरणांतील पाणीसाठ्याचा नियमित आढावा घेतला जात असून अंतिम निर्णय हवामानाच्या पुढील स्थितीवर अवलंबून असेल. पावसाचा विलंब कायम राहिल्यास पाणी व्यवस्थापनासाठी अधिक कठोर उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात. यामुळे आता मुंबईकरांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, मान्सून कधी दाखल होणार आणि उकाडा व पाणीटंचाईपासून कधी दिलासा मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >