Nashik News : शेतकऱ्यांवर येणारं संकट , त्याची होणारी पिळवणूक नेमकी थांबणार कधी हा मोठा प्रश्न पुन्हा एका घटनेनं उपस्थित झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठी फसवणूक झाली आहे. व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार बागलाण (Baglan) तालुक्यात उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे, मका, कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात (Jaykheda Police Station) एकाच दिवशी तब्बल तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे आणि वारस नोंदीत नाव ...
मका उत्पादक शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाखांचा गंडा ?
पहिली धक्कादायक घटना ताहाराबाद (Taharabad) येथील ‘मुक्ताई ट्रेडिंग कंपनी’शी (Muktai Trading Company ) संबंधित आहे. या कंपनीच्या संचालकांनी परिसरातील १७० ते १८० मका उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मका खरेदी केला, मात्र त्याचे पैसेच अदा केले नाहीत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मोहन शंकर भामरे (रा. पिंपळकोठे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, व्यापारी नारायण सुपडू बागूल, जयेश नारायण बागूल, दत्तात्रय सुपडू बागूल, संदेश दत्तात्रय बागूल आणि उमेश पाटील यांनी फेब्रुवारी २०२६ पासून शेतकऱ्यांकडून मका खरेदी सुरू केली होती.
महिन्याभरात पैसे देतो” असे गोड बोलून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यात आला. मात्र, महिना उलटल्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ करत तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शेतकरी आज पैसे मिळतील, उद्या मिळतील या आशेवर दिवस काढत होते. मात्र अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. ( Baglan Crime News )
कांदा उत्पादकांनाही सोडले नाही
धक्कादायक बाब म्हणजे, मका खरेदीतील फसवणुकीचे आरोप असलेल्या याच व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही गंडा घातल्याचे समोर आले आहे. कैलास गोपीचंद ठाकरे (रा. लाडुद, ता. बागलाण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, परिसरातील तब्बल १०२ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात आला. पैसे महिन्याभरात देण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र नंतर शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावण्यात आले. अखेरीस, विक्री केलेल्या कांद्याचे पैसे न मिळाल्याने ७० लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Baglan Crime News )
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi New Record) यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सलग सर्वाधिक काळ देशाचे निवडून आलेले ...
द्राक्ष उत्पादकांनाही लाखोंचा फटका
त्यासोबतच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांनी मोठा आर्थिक झटका दिल्याचे उघड झाले आहे. देवेंद्र दिलीप धोंडगे (रा. खामलोण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक मगन बोढारे (रा. सिडको, नाशिक) आणि शशिकांत दौलत गवळी (रा. नारायणटेंभी, ता. निफाड) या व्यापाऱ्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये शेतकऱ्यांकडून द्राक्षांची खरेदी केली होती. '२१ दिवसांत पैसे देतो' असे आश्वासन देत ६९ लाख ३५ हजार २८३ रुपयांची द्राक्षे खरेदी करण्यात आली. मात्र, मुदत संपल्यानंतरही व्यापाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.( Baglan Crime News )
घामाचा पैसा अडकला; शेतकरी हवालदिल
रात्रंदिवस मेहनत करून, नैसर्गिक संकटांचा सामना करत उभा केलेला शेतमाल विकल्यानंतरही घामाचा पैसा व्यापाऱ्यांकडे अडकून पडल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता या संशयित व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळून अडकलेले कोट्यवधी रुपये तातडीने वसूल करून द्यावेत, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल झाल्यामुळे बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे.






