नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एका गूढ आणि थरारक हत्याकांडाचा (Murder) पनवेल तालुका पोलिसांनी उलगडा केला आहे. प्रेयसीच्या लग्नाच्या आग्रहाला कंटाळून एका २७ वर्षीय तरुणाने तिची हत्या करून मृतदेह जाळल्याचा आरोप असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Navi Mumbai Crime)
११ एप्रिल रोजी चिंचवली-वाकडी गावाच्या हद्दीतील राजमती वनक्षेत्रात एका महिलेचा पूर्णतः जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. घटनास्थळी कोणतेही ओळखपत्र किंवा महत्त्वाचा पुरावा सापडला नव्हता.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी आणि तांत्रिक माहितीची पडताळणी केली. त्यातून मृत महिलेची ओळख मुंब्रा-दिवा परिसरातील ३० वर्षीय अनितादेवी भगवान राजभर अशी पटली. तिच्याजवळ सापडलेली अंगठी, नथ, कानातील दागिने आणि मनगटावरील पवित्र दोरा हे ओळख पटविण्यासाठी महत्त्वाचे ठरले.
मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांसाठी एक मोठं तांत्रिक अपग्रेड (Technological Upgrade) घेऊन येत आहे. तब्बल ४० वर्षांपासून वापरात असलेल्या पॅसेंजर रिझर्व्हेशन ...
पुढील तपासात पोलिसांना अनितादेवीचा सतत संपर्क करण नामदेव पाटील या तरुणाशी असल्याचे आढळले. चौकशीसाठी बोलावूनही तो हजर न राहिल्याने संशय अधिक बळावला. मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत महिला यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, महिला लग्नासाठी सातत्याने आग्रह धरत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. या नात्यातून सुटका मिळवण्यासाठी आरोपीने कट रचल्याचा आरोप आहे.
६ एप्रिल रोजी आरोपीने महिलेला आपल्या होंडा सिटी कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेले. तेथे लोखंडी सळीने तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह जंगल परिसरात नेऊन कारच्या टाकीतील पेट्रोल काढून त्यावर ओतले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून दिला, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत.






