Wednesday, June 10, 2026

Beed Boat Accident : अधिकमास यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; पुरुषोत्तमपुरीत ५० भाविकांनी भरलेली बोट पलटली; १०-१२ वर्षांचा मुलगा बेपत्ता

Beed Boat Accident : अधिकमास यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; पुरुषोत्तमपुरीत ५० भाविकांनी भरलेली बोट पलटली; १०-१२ वर्षांचा मुलगा बेपत्ता

बीड : देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. गोदावरी नदीत भाविकांनी खचाखच भरलेली बोट अचानक पलटल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अनेक भाविक थोडक्यात बचावले असले तरी १० ते १२ वर्षांचा एक मुलगा अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे यात्रेच्या नियोजनावर आणि सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Beed Boat Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकमास यात्रेसाठी आलेले सुमारे ५० भाविक नदी पार करण्यासाठी बोटीत बसले होते. मात्र, बोटीची क्षमता कमी असतानाही त्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. नदीच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर बोटीचा तोल गेल्याने ती अचानक पलटली आणि क्षणार्धात सर्वजण पाण्यात फेकले गेले. (Beed Boat Accident)

महिलांनी सांगितला थरारक अनुभव :

या दुर्घटनेतून बचावलेल्या महिलांनी आपबिती सांगताना भीतीदायक क्षणांचा उल्लेख केला. "काही क्षणांसाठी आम्ही पूर्णपणे पाण्याखाली गेलो होतो. आता आपण वाचणार नाही असे वाटत होते. लहान मुले, महिला आणि वृद्धांचा आक्रोश सुरू होता. काही जणांनी पोहत किनारा गाठला, तर काहींना स्थानिकांनी मदत केली," असे एका महिलेने सांगितले. घटनेनंतर नदीकाठावर एकच गोंधळ उडाला. भाविकांनी आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी धावाधाव केली. बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ग्रामस्थांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. (Beed Boat Accident)

नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप :

भाविकांनी बोटधारकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, यात्रेतील गर्दीचा फायदा घेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात होते. अनेक प्रवाशांकडे लाइफ जॅकेट नव्हते. बोटींवर कोणतीही सुरक्षा तपासणी होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. "प्रवाशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी कोणीही नव्हते. बोट भरल्यावरही आणखी लोकांना बसवण्यात आले. आम्ही विरोध केला, पण आमचे कोणी ऐकले नाही," अशी प्रतिक्रिया काही भाविकांनी दिली. (Beed Boat Accident)

मोठी दुर्घटना टळली, पण धोक्याची घंटा :

सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, नदीत पडलेल्या अनेक भाविकांना स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जर पाण्याचा प्रवाह अधिक वेगवान असता किंवा बचावकार्य उशिरा सुरू झाले असते, तर परिस्थिती आणखी गंभीर बनली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (Beed Boat Accident)

दोषींवर कारवाईची मागणी :

या घटनेनंतर भाविक, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बोटधारक, संबंधित कंत्राटदार आणि सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, बेपत्ता मुलाचा शोध सुरू असून प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, "एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का?" असा सवाल उपस्थित करत भाविकांनी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (Beed Boat Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >