Friday, June 5, 2026

Former President Dr.Kalam : माजी राष्ट्रपती डॉ. कलामांचे नाव पुसून आयटीआयला हाजी बाबांचे नाव द्या!

Former President Dr.Kalam : माजी राष्ट्रपती डॉ. कलामांचे नाव पुसून आयटीआयला हाजी बाबांचे नाव द्या!

काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा प्रस्ताव; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रस्ताव फेटाळला

मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन आणि महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव बदलून मुंबईतील एका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) 'हाजी अब्दुल रहमान शाह बाबा' यांचे नाव देण्याचा काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळून लावला आहे. डॉ. कलाम यांचे देशासाठी असलेले योगदान वंदनीय असून, त्यांचे नाव पुसण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे, अशा शब्दांत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रस्तावाचा तीव्र निषेध केला. राज्यातील भावी पिढीला देशाच्या महापुरुषांच्या विचारांची, कार्याची आणि त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची ओळख व्हावी तसेच त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने कौशल्य विकास विभागाच्या वतीने २०२४ मध्ये एक धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) देशातील थोर महापुरुषांची नावे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार, मुंबईतील मांडवी येथील शासकीय आयटीआयला देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले होते.मात्र, काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव बदलण्याचा अजब प्रस्ताव कौशल्य विकास विभागाकडे सादर केला. या प्रस्तावामध्ये मांडवी येथील आयटीआयचे नाव बदलून ते 'हाजी अब्दुल रहमान शाह बाबा' असे ठेवण्यात यावे, अशी मागणी पटेल यांच्याकडून करण्यात आली होती.

प्रस्ताव आम्ही कचऱ्याच्या पेटीत टाकला - मंत्री लोढा

या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, "इतक्या महान आणि राष्ट्रप्रेमी व्यक्तीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या विभागासमोर मांडला गेला, याचा मला अत्यंत खेद वाटतो. डॉ. अब्दुल कलाम साहेबांचे देशाच्या संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील योगदान अफाट आहे. त्यांचे नाव पुसून टाकण्याचा झालेला हा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. म्हणूनच, आमदार अमीन पटेल यांनी दिलेला हा वादग्रस्त प्रस्ताव आम्ही फेटाळून लावला आहे. महायुती सरकार देशाच्या अस्मितेशी आणि महापुरुषांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड करणार नाही", अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा