मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून मुंबईसह देशावर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवणारी एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्याने प्रशासनात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ऑगस्ट २०२६ मधील ९ ते १८ हा कालावधी अत्यंत संवेदनशील आणि धोक्याचा असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून सायबर सेलच्या मदतीने अधिक तपास सुरू केला आहे.
सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टमध्ये नक्की काय?
India shall be careful in the month of August 2026... 9th to 18th August very dangerous time period... Big terrorist attacks possible by Pakistani Terrorists... https://t.co/kCJi5WDTQq
— Prashanth Kini (@AstroPrashanth9) August 4, 2026
‘@AstroPrashnath9’ नावाच्या एका एक्स अकाऊंटवरून ही धक्कादायक माहिती प्रसिद्ध करण्यात आली. इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या पोस्टमध्ये, "India shall be careful in the month of August 2026… 9th to 18th August very dangerous time period… Big terrorist attacks possible by Pakistani Terrorists" असा थेट इशारा देण्यात आला आहे. म्हणजेच, ९ ते १८ ऑगस्ट हा काळ भारतासाठी अत्यंत धोकादायक असून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून मोठा हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, असा दावा यात करण्यात आला आहे. ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने रिशेअर झाली आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Jalgaon : जळगाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. काळ जवळ आलेल्या एका तरुणाने एकदा मृत्यूला हुलकावणी दिली मात्र त्याच्या एका चुकीने त्याला पुन्हा ...
नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकरण पोलिसांपर्यंत
या संशयास्पद पोस्टकडे एका सतर्क नागरिकाचे लक्ष गेले. ‘@tstark86v1’ या हँडलवरून ही पोस्ट मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडलला टॅग करण्यात आली आणि घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले गेले. टॅग मिळताच मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने तातडीने हालचाली करत तपासाची चक्रे फिरवली आहेत. सदर अकाऊंट चालवणारी व्यक्ती कोण आहे, तिच्याकडे या हल्ल्याबाबत काही ठोस इनपुट अथवा माहिती आहे का, की हा केवळ अफवा पसरवण्याचा प्रयत्न आहे, याचा शोध आता घेतला जात आहे.
धमक्यांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा हायअलर्टवर
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहर आणि परिसराला लक्ष्य करणाऱ्या धमक्यांचे सत्र सातत्याने सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ऐतिहासिक ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती, तर अनेकदा सरकारी इमारती, प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांचे बंगले आणि विमान कंपन्यांना बॉम्बच्या खोट्या धमक्यांचे ईमेल व कॉल आले आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर थेट तारखांचा उल्लेख करून दिलेली ही धमकी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जात आहे.
पोलिसांचे नागरिकांना शांततेचे आणि सतर्कतेचे आवाहन
मुंबई पोलीस या प्रकरणाचा मुळापासून तपास करत असून शहरातील सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा किंवा भीती पसरवणाऱ्या पोस्ट न फॉरवर्ड करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






