मुंबई : भारतीय मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ५ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या पतधोरणाची (Monetary Policy) घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मौद्रिक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत सलग तिसऱ्यांदा मुख्य व्याजदरात म्हणजेच रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्याचा रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर राहणार असून आरबीआयने आपले धोरण 'न्यूट्रल' (Neutral) ठेवले आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माहिती दिली की, समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने रेपो रेट स्थिर ठेवण्याच्या बाजूने मतदान केले. मुख्य व्याजदरासोबतच रिझर्व्ह बँकेने 'स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी' (SDF) दर ५% वर, तर 'मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी' (MSF) आणि बँक दर ५.५% वर कायम ठेवले आहेत.
जागतिक आव्हानांनंतरही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत
मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक आणि आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आरबीआयची ही ऑगस्ट महिन्यातील बैठक पार पडली. जुलैच्या सुरुवातीपासून या युद्धाचा भडका पुन्हा उडाल्याने इंधनाच्या आणि ऊर्जेच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये मोठी घसरण आणि चढ-उतार पाहायला मिळत आहेत. असे असले तरी, भारतीय अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत (Q1) अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली असल्याचे गव्हर्नर मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. उत्पादन क्षेत्राने (Manufacturing Sector) पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी दाखवली आहे, तसेच देशांतर्गत ग्राहकांकडून होणारा खर्च आणि मागणी अजूनही भक्कम स्थितीत आहे.
बंगळुरू : प्रायमरी मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर 'मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस' (Manipal Health Enterprises) या प्रसिद्ध हॉस्पिटल साखळीच्या शेअर्सचे ...
GDP वाढीचा अंदाज सुधारला
आरबीआयने आर्थिक वर्ष २०२६-२७ (FY27) साठीच्या देशाच्या जीडीपी (GDP) वाढीच्या अंदाजात सुधारणा केली असून तो ६.६ टक्क्यांवरून वाढवून ६.७ टक्के केला आहे.
पहिल्या तिमाहीचा (Q1) GDP अंदाज : ६.६% वरून थेट ७% करण्यात आला आहे.
दुसऱ्या तिमाहीचा (Q2) GDP अंदाज : ६.३% वरून वाढवून ६.४% करण्यात आला आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीचा अंदाज: तिसऱ्या तिमाहीचा (Q3) अंदाज ६.५% आणि चौथ्या तिमाहीचा (Q4) अंदाज ६.८% वर कायम ठेवण्यात आला आहे.
यावरून चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात देशाच्या विकासाचा वेग कायम राहील, असा ठाम विश्वास रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.
महागाईच्या (Inflation) दराबाबत दिलासादायक चित्र
आरबीआयने देशातील किरकोळ महागाई दराच्या (CPI Inflation) अंदाजात किंचित घट केली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर ५% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो पूर्वी ५.१% असा वर्तवण्यात आला होता.
Q1 महागाई अंदाज : ४.२% वरून कमी करून ४.१% करण्यात आला.
Q2 महागाई अंदाज : ५.१% वरून घटवून ४.७% करण्यात आला.
Q3 महागाई अंदाज : पूर्वीप्रमाणे ५.९% वर स्थिर ठेवण्यात आला.
Q4 महागाई अंदाज : ५.४% वरून किंचित वाढवून ५.५% करण्यात आला आहे.
आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जाचे हप्ते (EMI) सध्या जसे आहेत तसेच राहतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.






