- जीवनगंध; पूनम राणे
हॅलो मॅडम, ओळखलंत का मला?” मी केतकी बर्वे. “हो, हो, ओळखलं गं.” “अशी कशी विसरेन बरं!” “कशा आहात?” “मजेत! एकदम छान!” “तू कशी आहेस?” “छानच!” “आज कशी बरे आठवण झाली?” मॅडम, एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. माझ्या कवितेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. नामांकित मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा होणार आहे. या सगळ्याचे श्रेय आपलेच आहे मॅडम. “अरे वा! अभिनंदन! अभिनंदन! त्रिवार अभिनंदन तुझे!” मॅडम, सर्व श्रेय आपलेच आहे. “अगं, माझे कसे!” सारी प्रतिभा तुझी... “आणि तू किती छान लिहितेस?” छान विचार करतेस आणि तेही संवेदनशील मनाने! त्यामुळे हे सारे श्रेय, म्हणूनच सारी प्रतिभा तुझीच बेटा! “खूप खूप मोठी हो! माझ्या प्रेमळ शुभेच्छा तुला.” ओके, बाय मॅडम. केतकी बर्वे, एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व. नेहमीच शालेय व महाविद्यालयात विविध स्पर्धेत सहभाग घेणारी. विवाहबंधनात अडकल्यानंतर काही छंद तिला जोपासता येईनात. एकत्र कुटुंबातील सर्वांचे करता करता दिवस कसा जातो हेच तिला कळत नसे. दोन वर्षांपूर्वीच तिचा विवाह झाला होता आणि कोरोनाच्या काळात पतीचे निधन. यातच केतकी कोलमडून गेली होती. एकाकी पडली होती. अनेक वेळा माणसाला एकटेपणा हवा असतो. मात्र असा एकटेपणा नकोसा वाटतो. तिला वाचनाची प्रचंड आवड होती. मात्र वाचून मनात व्यक्त झालेले विचार कुणाजवळ मांडावेत!” या विचारात असतानाच एके दिवशी वर्तमानपत्रांमध्ये तिने बातमी वाचली. सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका दिवाळी अंक संपादित करीत आहेत. त्याकरिता स्वरचित कथा, कविता, लेख खाली दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावेत.
केतकीला फार आनंद झाला. तिने वही घेतली. तिला एक कविता सुचली. कविता लिहून दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअॅप केली. आयोजकांमार्फत सर्व आलेल्या कवितांची छाननी केली गेली. त्यामध्ये दोन कविता बाजूला ठेवल्या गेल्या.
याबाबतची सर्व माहिती ज्येष्ठ साहित्यिकांना कळविण्यात आली. दोन कविता बाजूला ठेवल्या आहेत असे सांगण्यात आले. तेव्हा त्या म्हणाल्या, “मला कविता वाचून दाखवा. म्हणजे मी ठरवेन त्या घ्यायच्यात की नाही. निर्णयक मंडळाने त्या कविता ज्येष्ठ साहित्यिकेला वाचून दाखवल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, “अरे वा!” या दोन्ही कविता छान आहेत. खरं तर त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी कागदावर टिपल्या आहेत.
खरं सांगू का,“जर या कविता मी माझ्या दिवाळी अंकात छापल्या नाहीत, तर कदाचित त्या दोघींना वाईट वाटेल आणि त्या लिहिणेच सोडून देतील.” अशाप्रकारे त्या दोघींमधील एक होती केतकी बर्वे. केतकीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिला अत्यंत आनंद झाला. त्यानंतर केतकीने मागे वळून केव्हाच पाहिले नाही. तिचे लिहिणं चालूच राहिले. विविध काव्यलेखन, काव्यवाचन स्पर्धेमध्ये ती भाग घेऊ लागली. ज्येष्ठ साहित्यिकेने दिलेल्या प्रोत्साहनामुळे सर्व शक्य झाले.






