Sunday, May 24, 2026

Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

विजय मांडे, कर्जत : मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या रडारवर आहेत. देशद्रोही कारवायांसाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत पुरवणाऱ्या मदरशांवर पोलिसांनी धाडी टाकाव्या, कारवाई करावी; असे मंत्री नितेश राणे म्हणाले. ते कर्जत तालुक्यातील नेरळ येथील अंबिका नाका परिसरात आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते. जे या देशात राहून तिरंग्याचा सन्मान करणार नाहीत किंवा वंदे मातरम म्हणण्यास विरोध करतील, त्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राष्ट्रापेक्षा कुणीही मोठे नसल्याचेही मंत्री नितेश राणेंनी खडसावून सांगितले.

समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी शासन म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. पण हिंदू समाजाने संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू म्हणून आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. हिंदू समाजाने जागरूक, संघटित आणि सजग राहणे ही काळाची गरज आहे. हिंदूंवर अन्याय अथवा अत्याचार झाल्यास संपूर्ण समाजाने एकजुटीने आणि ताकदीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.

नेरळच्या कार्यक्रमाला विराट हिंदू संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त जवान कुमारजाधव, अविनाश मोरे, वर्षा जोशी, ह.भ.प. दीपक महाराज जगताप, विश्वभर पार्टे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण सहकार्यवाह ॲड. अमोल सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री नितेश राणेंच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनात बोलताना देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंनी निर्वाणीचा इशारा दिला.

थोडे आमिष दाखवले की काही लोक धर्मांतराकडे वळतात. मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही. आपण त्यांच्या मावळ्यांप्रमाणे जगले पाहिजे. आमच्या धर्मात दुसऱ्या धर्माचा नाश करून स्वतःचा धर्म वाढवण्याची शिकवण नाही, मात्र इस्लाममध्ये तसे आहे. हिंदूंना मुस्लिमांपासून नव्हे तर हिंदूंमधीलच निष्क्रियतेपासून धोका असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी चिंता व्यक्त केली. जिहाद, लोकसंख्या आणि हिंदुत्व यांसंदर्भातही त्यांनी भाष्य केले. दंगलीच्या वेळी पोलिसांवर दगडफेक होते. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी असे मंत्री नितेश राणे म्हणाले. सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.

याआधी प्रास्ताविकात ॲड. सूर्यवंशी यांनी हिंदू समाजाच्या संघटनाची आवश्यकता अधोरेखित केली. तर मंत्री नितेश राणे यांनी सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी, “गर्व से कहो हम हिंदू हैं,” असे म्हणत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समर्थन देण्यासाठी आपण येथे आल्याचे सांगितले. या कार्यक्रमात अविनाश मोरे यांनी हिंदू समाजाच्या ऐक्यावर भर दिला. “इतिहासात अनेक संकटे आली, मात्र हिंदू समाजाने पुन्हा उभारी घेतली. प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी काम करावे,” असे ते म्हणाले. वर्षा जोशी यांनी पर्यावरण, समरसता, कुटुंब प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर भाष्य केले. “निरोगी आणि सजग समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा,” असे आवाहन त्यांनी केले. सभेला नेरळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सभास्थळ बाजारपेठ परिसरात असल्याने आसपासच्या इमारतींवरही पोलिस तैनात करण्यात आले होते. ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती. नेरळ ते कर्जत मार्गावर तसेच संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभा संपल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परतीच्या मार्गावरही २००पोलिस तैनात करण्यात आले होते.

Comments
Add Comment