Friday, May 22, 2026

Mount Everest Indian Climbers : एव्हरेस्ट सर केला, पण परतीचा प्रवास ठरला अखेरचा! दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू

Mount Everest Indian Climbers : एव्हरेस्ट सर केला, पण परतीचा प्रवास ठरला अखेरचा! दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) वर यशस्वी चढाई केल्यानंतर परतीच्या प्रवासात दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गिर्यारोहण क्षेत्रात शोककळा पसरली असून एव्हरेस्ट मोहिमेतील वाढत्या धोक्यांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. (Mount Everest Indian Climbers)

नेपाळची राजधानी काठमांडू (Kathmandu) येथून मिळालेल्या माहितीनुसार, मृत गिर्यारोहकांची ओळख अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे अशी झाली आहे. दोघांनीही अत्यंत कठीण परिस्थितीत एव्हरेस्ट शिखर सर केले होते. मात्र खाली उतरताना अतिशय थकवा, ऑक्सिजनची कमतरता आणि शरीराची मर्यादा ओलांडल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली. (Mount Everest Indian Climbers)

शिखर सर केल्यानंतर घडली दुर्घटना :

माहितीनुसार, संदीप अरे यांनी बुधवारी (२० मे) एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई केली होती, तर अरुण कुमार तिवारी यांनी गुरुवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता शिखर गाठले. दोघेही परतीच्या मार्गावर असताना त्यांना प्रचंड थकवा जाणवू लागला. उणे तापमान, विरळ हवा आणि कठीण बर्फाळ मार्गामुळे त्यांची तब्येत अधिकच बिघडली. नेपाळ एक्स्पिडिशन ऑपरेटर्स असोसिएशनचे महासचिव ऋषी भंडारी यांनी सांगितले की, मार्गदर्शक आणि बचाव पथकाने दोन्ही गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अत्यंत प्रतिकूल हवामान आणि शारीरिक थकव्यामुळे त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. (Mount Everest Indian Climbers)

‘डेथ झोन’ पुन्हा चर्चेत :

एव्हरेस्टवरील ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीचा भाग ‘डेथ झोन’ म्हणून ओळखला जातो. या भागात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे गिर्यारोहकांना श्वास घेण्यास मोठा त्रास होतो आणि शरीराची ऊर्जा झपाट्याने कमी होते. तज्ज्ञांच्या मते, शिखर सर केल्यानंतर खाली उतरण्याचा प्रवास हा अधिक धोकादायक असतो आणि अनेक अपघात याच टप्प्यात घडतात. (Mount Everest Indian Climbers)

एका दिवसात २७४ गिर्यारोहकांनी गाठलं शिखर :

विशेष म्हणजे याच मोहिमेदरम्यान एका दिवसात तब्बल २७४ गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर सर करून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. या मोहिमेत इतर भारतीय गिर्यारोहक तुलसी रेड्डी पालपुनूरी आणि अजय पाल सिंह धालीवाल यांनीही यशस्वी चढाई केली. तसेच गुरुवारी भारतीय महिला गिर्यारोहक लक्ष्मीकांता मंडल यांनीदेखील जगातील सर्वोच्च शिखर सर करत मोठी कामगिरी केली. मात्र या यशाच्या पार्श्वभूमीवर दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याने आनंदावर विरजण पडले आहे. (Mount Everest Indian Climbers)

सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह :

दरवर्षी हजारो गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेसाठी नेपाळमध्ये दाखल होतात. मात्र वाढती गर्दी, बदलते हवामान, ऑक्सिजनची कमतरता आणि मर्यादित बचाव सुविधा यामुळे अनेकदा जीवघेण्या घटना घडतात. या दुर्घटनेनंतर एव्हरेस्ट मोहिमेतील सुरक्षिततेचे निकष अधिक कठोर करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. दरम्यान, मृत गिर्यारोहकांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Mount Everest Indian Climbers)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >