Thursday, May 21, 2026

Pulwama Attack Mastermind Killed : पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची हत्या; पीओकेमध्ये हमजा बुरहानची गोळ्या झाडून हत्या, पाकिस्तानात खळबळ

Pulwama Attack Mastermind Killed : पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची हत्या; पीओकेमध्ये हमजा बुरहानची गोळ्या झाडून हत्या, पाकिस्तानात खळबळ

२०१९ मध्ये संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जाणारा हमजा बुरहान उर्फ अर्जुमंद गुलजार दार याची पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये आणि दहशतवादी संघटनांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुजफ्फराबाद परिसरात हमजा बुरहानवर अचानक हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून अनेक गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोर कोण होते, त्यांनी हा हल्ला का केला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हमजा बुरहान हा दहशतवादी संघटना ‘अल बद्र’शी संबंधित असल्याचे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने २०२२ मध्ये त्याला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत त्याचे नाव अर्जुमंद गुलजार दार उर्फ हमजा बुरहान उर्फ डॉक्टर असे नमूद करण्यात आले होते. तो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा येथील खरबतपोरा भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले होते.

विशेष म्हणजे, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद डार याने स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर धडकवले होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथपोरा परिसरात झालेल्या या भीषण स्फोटात तब्बल ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत बालाकोट एअर स्ट्राईक केली होती.

दरम्यान, हमजा बुरहानच्या हत्येमागे अंतर्गत गटबाजी, सूड की गुप्त कारवाई, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काही सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये वाढलेले अंतर्गत संघर्ष आणि वर्चस्वाची लढाई हेही या हत्येमागचे कारण असू शकते.

या घटनेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या असून, संबंधित घडामोडींवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही देश विसरलेला नसताना, या घटनेने पुन्हा एकदा त्या काळाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >