Wednesday, May 20, 2026

KKR vs MI : KKR च्या विजयाने राजस्थानचं टेन्शन वाढलं, प्लेऑफचं गणित पुन्हा बदललं

KKR vs MI : KKR च्या विजयाने राजस्थानचं टेन्शन वाढलं, प्लेऑफचं गणित पुन्हा बदललं

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) काल झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) ४ विकेट्स राखून पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवले आहे. या विजयामुळे केवळ KKR चा आत्मविश्वास वाढलेला नाही, तर राजस्थान रॉयल्ससह अनेक संघांची समीकरणंही पूर्णपणे बदलली आहेत.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईकडून काही फलंदाजांनी सुरुवात चांगली केली, मात्र KKR च्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये अचूक मारा करत मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. त्यामुळे मुंबईला निर्धारित षटकांत १४८ धावांवर समाधान मानावं लागलं.

१४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. फिन अॅलेन अवघ्या ८ धावांवर बाद झाला आणि KKR ला पहिला धक्का बसला. त्यानंतर मनीष पांडे मैदानात आला आणि त्याने अजिंक्य रहाणेसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे चांगल्या लयीत दिसत असतानाच तो २१ धावांवर बाद झाला.

रहाणेनंतर कॅमरून ग्रीनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तोही केवळ ४ धावांवर माघारी परतला. त्यामुळे KKR ची अवस्था ५४ धावांत ३ बाद अशी झाली होती आणि मुंबई इंडियन्स सामन्यावर पकड मजबूत करताना दिसत होती.

अशा कठीण परिस्थितीत मनीष पांडे आणि रोवमन पॉवेल यांनी जबाबदारी स्वीकारत संघाचा डाव सावरला. दोघांनी संयमी पण आक्रमक फलंदाजी करत KKR ला पुन्हा सामन्यात आणलं. मनीष पांडेने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर रोवमन पॉवेलने ४० धावांचं योगदान दिलं. मात्र या दोघांचे विकेट्स झटपट पडल्याने सामना पुन्हा रंगतदार झाला.

शेवटच्या टप्प्यात रिंकू सिंह आणि तेजस्वी दहियाने शांतपणे खेळ करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. अखेर रिंकू सिंहने शानदार चौकार ठोकत KKR ला ४ विकेट्सने संस्मरणीय विजय मिळवून दिला.

या विजयासह KKR चे आता १३ सामन्यांत १३ गुण झाले असून संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे या विजयामुळे प्लेऑफची शर्यत आणखी रोमांचक बनली आहे. KKR चा अजून एक सामना बाकी असून तो जिंकला तर त्यांचे १५ गुण होतील आणि चौथ्या स्थानासाठी त्यांचा मजबूत दावा निर्माण होईल.

सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचे १३ सामन्यांत १४ गुण आहेत. राजस्थानने अखेरचा सामना गमावला आणि KKR ने आपला शेवटचा सामना जिंकला, तर कोलकाता थेट प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. मात्र त्यासाठी पंजाब, चेन्नई आणि दिल्ली यांच्याही पराभवाची KKR ला प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे KKR च्या या मोठ्या विजयाने राजस्थान रॉयल्सची धाकधुक वाढली असून प्लेऑफचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >