Tuesday, May 19, 2026

RR vs LSG : ३८ बॉलमध्ये ९३ धावा! वैभवच्या तडाख्याने ४ टीमना धक्का

RR vs LSG : ३८ बॉलमध्ये ९३ धावा! वैभवच्या तडाख्याने ४ टीमना धक्का

मुंबई : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जाएंट्सचा तब्बल ७ विकेट्स राखून पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. या सामन्यात राजस्थानच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने खेळलेली तुफानी खेळी चर्चेचा विषय ठरली. त्याच्या वादळी फलंदाजीमुळे केवळ राजस्थानलाच विजय मिळाला नाही, तर प्लेऑफचे संपूर्ण समीकरणही पुन्हा बदलले आहे.

प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जाएंट्सने राजस्थानसमोर २२१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मिचेल मार्शने ९६ धावांची दमदार खेळी केली, तर जोश इंग्लिसने ६० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर लखनऊने २० षटकांत २२० धावा उभारल्या.

या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात आक्रमक झाली होती. यशस्वी जयस्वालने ४३ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र तो बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या वैभव सूर्यवंशीने लखनऊच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्लाबोल केला. त्याने अवघ्या ३८ चेंडूंमध्ये ९३ धावांची स्फोटक खेळी करत सामन्याचे चित्रच बदलून टाकले. वैभवचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले, पण त्याच्या खेळीमुळे राजस्थान विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला.

वैभव बाद झाल्यानंतर लुहान ड्री प्रिटोरियस मैदानात आला. मात्र तो केवळ ७ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर डोनावन फरेरा फलंदाजीला आला. दुसऱ्या बाजूला ध्रुव जुरेलने शांत पण प्रभावी खेळी करत ५३ धावा केल्या आणि राजस्थानला ७ विकेट्स राखून शानदार विजय मिळवून दिला.

या विजयासह राजस्थान रॉयल्सचे १३ सामन्यांत १४ गुण झाले आहेत. मात्र राजस्थानच्या या विजयाचा मोठा फटका एक-दोन नव्हे तर तब्बल चार संघांना बसला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत आता पंजाब किंग्ज, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांचे गणित पूर्णपणे बदलले आहे.

राजस्थानच्या विजयामुळे पंजाब किंग्ज आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरली आहे. पंजाबचे १३ सामन्यांत १३ गुण आहेत. त्यामुळे आता पंजाबला त्यांचा शेवटचा सामना जिंकण्यासोबतच राजस्थानच्या अखेरच्या सामन्यातील पराभवाचीही वाट पाहावी लागणार आहे. तरच पंजाबला प्लेऑफमध्ये प्रवेशाची संधी मिळू शकते.

चेन्नई सुपर किंग्जचे १३ सामन्यांत १२ गुण आहेत. चेन्नईने पुढील सामना जिंकला तरी त्यांचे १४ गुण होतील. मात्र त्यानंतरही त्यांना राजस्थान, पंजाब आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्याचबरोबर कोलकत्ताने एखादा सामना गमावल्यास चेन्नईसाठी प्लेऑफचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो.

दिल्ली कॅपिटल्सची स्थितीही जवळपास अशीच आहे. दिल्लीचेही १३ सामन्यांत १२ गुण आहेत. त्यामुळे शेवटचा सामना जिंकून ते १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. पण त्यासाठी त्यांना राजस्थान, पंजाब, चेन्नई आणि कोलकत्ताच्या पराभवाची अपेक्षा ठेवावी लागणार आहे.

दरम्यान, कोलकत्ता नाईट रायडर्सचे १२ सामन्यांत ११ गुण आहेत. कोलकत्ताने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे १५ गुण होऊ शकतात. अशा परिस्थितीत पंजाब, राजस्थान, चेन्नई आणि दिल्ली यांपैकी काही संघांना पराभव पत्करावा लागल्यास कोलकत्तासाठी प्लेऑफचे दरवाजे उघडे राहू शकतात.

राजस्थानच्या या एका विजयाने आयपीएलच्या प्लेऑफची लढत आणखी रंगतदार झाली असून आता शेवटच्या सामन्यांमध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >