Thursday, May 21, 2026

India exposed Pakistan : भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची लायकी काढली

India exposed Pakistan : भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची लायकी काढली

संयुक्त राष्ट्रे : ज्या देशाचा स्वतःचा इतिहास नरसंहाराने कलंकित आहे, अशा पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर आणि मानवाधिकारांवर आम्हाला ज्ञान शिकवावे, हा खूप मोठा विरोधाभास आहे," अशा कडक शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानची बोलती बंद केली आहे. स्वतःचे अंतर्गत अपयश लपवण्यासाठी देशाच्या आत आणि सीमेबाहेर हिंसाचार पसरवणे हा पाकिस्तानचा जुनाच पॅटर्न असल्याचा घणाघातही भारताने केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 'सशस्त्र संघर्षात नागरिकांचे संरक्षण' या विषयावरील वार्षिक खुल्या चर्चेदरम्यान भारताने ही आक्रमक भूमिका मांडली.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वथनेनी यांनी पाकिस्तानच्या प्रतिनिधीने जम्मू-काश्मीरचा जुनाच राग आळवल्यानंतर पाकला सडेतोड उत्तर दिले. पर्वथनेनी म्हणाले, "नरसंहाराचा दीर्घ आणि डागाळलेला इतिहास असलेल्या देशाने भारताच्या पूर्णपणे अंतर्गत असलेल्या विषयांवर भाष्य करावे, ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे. स्वतःच्याच जनतेवर बॉम्बफेक करणाऱ्या आणि पद्धतशीरपणे नरसंहार घडवून आणणाऱ्या देशाकडून अशाच कृत्यांची अपेक्षा केली जाऊ शकते."

अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यांचा दिला दाखला : या वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांचा संदर्भ देत भारताने पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर आणला. पर्वथनेनी यांनी ठणकावून सांगितले की, "पवित्र रमझान महिन्यात, जेव्हा जगात शांतता आणि करुणेचे वातावरण असते, तेव्हा पाकिस्तानने काबूलमधील 'ओमिद व्यसनमुक्ती रुग्णालया'वर हवाई हल्ला केला होता, हे जग विसरलेले नाही." संयुक्त राष्ट्राच्या अफगाणिस्तानमधील साहाय्य मिशनचा दाखला देत भारताने सांगितले की, पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यात २६९ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता, तर १२२ जण जखमी झाले होते.

९४,००० नागरिक विस्थापित: कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय सुविधेला लष्करी लक्ष्य बनवणे समर्थनीय ठरू शकत नाही. रात्रीच्या अंधारात निष्पाप नागरिकांना लक्ष्य करायचे आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या गप्पा मारायच्या, हा पाकिस्तानचा निव्वळ दुटप्पीपणा आहे. या सीमापार सशस्त्र हिंसाचारामुळे ९४,००० हून अधिक अफगाण नागरिक विस्थापित झाले आहेत.

'ऑपरेशन सर्चलाइट'ची करून दिली आठवण : भारताने पाकिस्तानला त्यांच्याच इतिहासातील काळ्या पानावरील अत्याचारांची आठवण करून दिली. १९७१ मधील 'ऑपरेशन सर्चलाइट'चा उल्लेख करत पर्वथनेनी म्हणाले की, पाकिस्तानने आपल्याच लष्कराद्वारे तब्बल ४ लाख महिलांवर पद्धतशीरपणे केलेल्या सामूहिक बलात्काराच्या मोहिमेला अधिकृत मंजुरी दिली होती. अशा क्रूर इतिहास असलेल्या देशाने मानवाधिकारांवर बोलणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >