Wednesday, May 20, 2026

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः विक्रमी पातळी गाठली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर उन्हाने कहर केला असून काही ठिकाणी तापमान चक्क ४६ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून भारतीय हवामान विभागाने (IMD) नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra Heat Wave)

नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील आठवडाभर विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Heat Wave)

नागपूरमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे उकाडाही प्रचंड वाढला असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने हवामान विभागाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये तापमान ४६ अंशांवर पोहोचले, तर आणखी तीन जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले होते. (Maharashtra Heat Wave)

दरम्यान, वर्धा जिल्ह्यातही उष्णतेने उच्चांक गाठला आहे. सलग दोन दिवस वर्ध्यात ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळपासूनच कडक उन्हाच्या झळा जाणवत असून दुपारी परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Heat Wave)

दिलासादायक बाब म्हणजे यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागणार आहे. (Maharashtra Heat Wave)

दरम्यान, मुंबईतही उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईतील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असून आर्द्रतेचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे “हॉट अँड ह्युमिड” वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे. (Maharashtra Heat Wave)

मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात सकाळपासूनच प्रचंड घाम आणि अस्वस्थता जाणवत आहे. समुद्रकिनारी भागात दमट वारे वाहत असल्याने उष्णतेचा त्रास आणखी वाढला आहे. काही भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज असला, तरी उकाड्यात फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. (Maharashtra Heat Wave)

हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलके व सैल कपडे वापरणे आणि उन्हात जास्त वेळ न राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस राज्यभर उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. (Maharashtra Heat Wave)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >