Wednesday, May 20, 2026

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. “पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका. राज्यात आणि देशात पुरेसा साठा उपलब्ध आहे. अफवांमुळेच पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होतो,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, केंद्र सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की देशाकडे पेट्रोल-डिझेलचा स्ट्रॅटेजिक साठा उपलब्ध आहे आणि पुरवठाही नियमित सुरू आहे. मात्र सोशल मीडियावर आणि विविध ठिकाणी तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याने नागरिक घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करत आहेत.

मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, “पुरवठा साखळी ही अनेक वर्षांच्या वापराच्या अंदाजावर आधारित असते. एखाद्या तालुक्यात किंवा पेट्रोल पंपावर दररोज किती इंधनाची गरज असते, यानुसार पुरवठा केला जातो. पण अचानक लोकांनी जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरायला सुरुवात केली, तर संपूर्ण साखळीवर ताण येतो.”

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासाठी बँकेचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “जर एका दिवशी सर्व लोकांनी बँकेत जाऊन पैसे काढायला सुरुवात केली, तर बँकेवर अचानक ताण येतो. याचा अर्थ बँकेकडे पैसे नाहीत असा होत नाही. तशीच परिस्थिती पेट्रोल-डिझेल पुरवठ्याची आहे.”

“जागतिक परिस्थिती सध्या तणावपूर्ण असली, तरी भारताने आपली पुरवठा व्यवस्था सक्षम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि इंधनाचा वापरही जबाबदारीने करावा,” असे आवाहनही त्यांनी (Devendra Fadnavis) केले.

दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील नागरिकांना दिलासा देत राज्यात किमान एक महिन्याचा पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. “हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. अमेरिका-इराण तणावामुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. मात्र राज्यात कोणतीही तातडीची कमतरता नाही,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

सध्या काही शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा दिसत असल्या, तरी प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >