Saturday, May 16, 2026

Mumbai Janganana : मुंबईकर गावाला, घराला टाळी आणि बंद घराची पाहणी करायला येणार जनगणनेचे कर्मचारी?

Mumbai Janganana : मुंबईकर गावाला, घराला टाळी आणि बंद घराची पाहणी करायला येणार जनगणनेचे कर्मचारी?

घरयादी व घरगणना मोहिमेला शनिवार पासून प्रारंभ, सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

मुंबई : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घरयादी व घरगणनेच्या प्रक्रियेला शनिवार, १६ मे २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम १४ जून २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत नियुक्त प्रगणक घरोघरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करणार आहेत. प्रगणकांच्‍या घर भेटीदरम्‍यान नागरिकांनी त्यांना अचूक, संपूर्ण व योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच, ज्यांनी स्व-नोंदणी केली आहे त्यांनी आपला स्व - गणना क्रमांक प्रगणकांना देणे आवश्यक आहे. घरयादी व घरगणना मोहिमेसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रधान जनगणना अधिकारी आश्विनी भिडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्टीमुळे अनेक कुटुंब गावी गेली आहेत. तर काहीजण बाहेरगावी गेलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घराला टाळी लागलेली असणार. त्यामुळे या बंद घरांची पाहणी करायला हे कर्मचारी जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जनगणना ही देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. अचूक माहितीच्या आधारे शासनाला योग्य नियोजन करता येते आणि नागरिकांपर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवता येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून प्रामाणिक व अचूक माहिती देऊन जनगणना २०२७ च्‍या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. घरयादी व घरगणना ही जनगणनेची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असून, या प्रक्रियेत घरांची संख्या, कुटुंबातील सदस्यांची माहिती तसेच उपलब्ध मूलभूत सुविधांची नोंद केली जाते. या माहितीच्या आधारे शासन विविध विकास आराखडे, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक असल्‍याचे आश्विनी भिडे यांनी नमूद केले आहे.

जनगणेसाठी संकलित केली जाणारी सर्व माहिती ही पूर्णपणे गोपनीय राखली जाते आणि ती केवळ शासकीय नियोजनासाठीच वापरली जाते. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने आणि निःसंकोचपणे योग्य माहिती द्यावी. नागरिकांचे सहकार्य हेच महानगराच्‍या आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्‍वासही आश्विनी भिडे यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >