Pratap Sarnaik : “व्यवसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

मुंबई : “महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे कोणावर बंधन घालणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर करणे आहे,” असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. रंगशारदा मंदिर येथे आयोजित हिंदी भाषिकांच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या “वर्धापन दिन व जल्लोष मेळावा” कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, “हिंदी भाषिक चालकांना स्वयंस्फूर्तीने मराठी शिकवण्यासाठी हाजी अराफत शेख यांनी केलेला अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा पद्धतीने चालक स्वतःहून पुढे येत असतील, तर शासनदेखील त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.” ते पुढे म्हणाले, “चालक बांधवांनी मराठी शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. शासनाने त्यांना तब्बल १०५ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, या कालावधीत जर त्यांनी किमान ' व्यवहारिक मराठी ' आत्मसात केली नाही, तर १६ ऑगस्टपासून त्यांच्यावर कारवाई करणे अटळ ठरेल,” असा इशाराही त्यांनी दिला.



राज्यातील रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक चालकांच्या योगदानाचा गौरव करताना मंत्री सरनाईक म्हणाले, “व्यवसायिक वाहन चालक हा केवळ चालक नसून महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देणारा खरा शिल्पकार आहे.” वाहतूक क्षेत्र हे समाजाशी थेट जोडलेले असल्याने चालकांचे बोलणे, वर्तन आणि भाषा यावर संपूर्ण व्यवस्थेची प्रतिमा अवलंबून असते, असेही त्यांनी नमूद केले.


महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची भूमी असल्याचे सांगत त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रवासी वाहनात बसल्यानंतर त्याला आपल्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे. ‘नमस्कार’, ‘कुठे जायचे?’, ‘किती भाडे होईल?’ एवढे तरी व्यवहारिक मराठी प्रत्येक चालकाला आले पाहिजे,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



परराज्यातून महाराष्ट्रात येऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालकांचे स्वागत करतानाच, स्थानिक भाषा आत्मसात केल्यास प्रवासी, पोलिस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी संवाद अधिक सुलभ होईल, गैरसमज कमी होतील आणि सेवा अधिक सुसंस्कृत बनेल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.


नवभारतीय शिव वाहतूक संघटनेने चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत, राज्य सरकारच्या माध्यमातून चालकांसाठी विविध कल्याणकारी योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.



“मराठीला विरोध म्हणून पाहू नका; ती आपुलकीची भाषा म्हणून स्वीकारा. ‘मी मराठी, तू मराठी, मराठी आमचा स्वाभिमान’ ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे,” असे आवाहन करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाचे आयोजन हाजी अराफत शेख यांनी केले होते.


कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा व टॅक्सी चालक उपस्थित होते.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा