माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : मुंबईतील पाव बेकरींमधील लाकूड भट्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेत या भट्ट्या पीएनजीवर रुपांतरीत करण्यास जुलैपर्यंतची डेडलाईन दिलेली असतानाच भाजपाचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईचा शतकानुशतके जुना पाककृती इतिहास जपण्यासाठी लाकूड-भट्टीच्या ओव्हन वापरणाऱ्या इराणी कॅफे/बेकरींना वारसा दर्जा देण्याची मागणी केली आहे. इराणी बेकर्स असोसिएशनने नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केल्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. लाकूड आणि कोळशा भट्टीच्या वापरावरील बंदी लागू केल्यास वडा पावसाठी आवश्यक असलेल्या पावच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
इराणी बेकर्स असोसिएशनने माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना निवेदन देऊन उद्योगावर होणारा विपरीत परिणाम अधोरेखित केला आहे. इराणी बेकर्स असोसिएशनने नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाव हा वडासोबत जाणारा एकमेव पूरक उत्पादन आहे हे सर्वज्ञात आहे. वडा पाव हा प्रत्येक मुंबईकराची मूलभूत गरज बनला आहे आणि पुरवठ्यातील कोणताही अडथळा अनपेक्षित भयंकर परिस्थिती निर्माण करेल.
इराणी बेकर्स असोसिएशनच्या निवेदनाच्या आधारे मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या या पत्रात नार्वेकर यांनी कोळशावरील बेकरी बंद करण्याच्या निर्णयाचा सर्वात जासत परिणाम दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित इराणी कॅफे आणि बेकरीवर होणार आहे. जे आपल्या शहराच्या खाद्य संस्कृती आणि इतिहासाचा दीर्घकाळ आधारस्तंभ राहिले आहेत. हे कॅफे आणि बेकरी एका शतकाहून अधिक काळापासून मुंबईत अस्तित्वात आहेत आणि ते वापरत असलेल्या लाकडापासून बनवलेले ओव्हन त्यांच्या वारसाचा अविभाज्य भाग आहेत. या कॅफे ज्या बेक्ड पदार्थांसाठी ओळखले जातात, त्यांची विशिष्ट चव आणि सुगंध हे लाकूड आणि कोळशावर आधारित वापरल्या जाणाऱ्या ओव्हनचा थेट परिणाम आहे. लाकूड किंवा कोळसा नसलेले ओव्हन पिढ्यान पिढ्या जपलेल्या पाककृतीची चव बदलतील, असे मकरंद नार्वेकर यांनी म्हटले आहे.
इराणी कॅफे हे केवळ रेस्टॉरंट नाहीत, तर मुंबईच्या पाककृती इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहेत असे सांगून, नार्वेकर यांनी पुढे असे म्हटले की, त्यांचे मूळ १९ व्या शतकात आहे, जेव्हा झोरास्ट्रियन इराणी स्थलांतरितांनी त्यांच्या पाककृती परंपरा मुंबईत आणल्या. आपल्या वारसाचा हा अविभाज्य भाग जपण्यासाठी, लाकूड आणि कोळशाच्या वापरावरील ओव्हनला बंदीतून सूट देऊन या इराणी कॅफे तथा बेकरीना वारसा दर्जा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे मुंबईच्या इतिहासाशी घट्ट जोडलेली एक महत्त्वाची सांस्कृतिक ओळख जपली जाईल, असे नार्वेकर यांनी नमूद केले.