Saturday, June 6, 2026

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचा टप्पा अखेर पूर्ण झाला असून शनिवारी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. या विस्तारित पुलामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवासाचा कालावधी तब्बल ३० ते ४० मिनिटांच्या प्रवासाचा वेळ आता केवळ ५ ते १० मिनिटांवर येणार आहे. या विस्तारीत पुलाच्या बांधकामासाठी भाजपचे स्थानिक नगरसेवक संदीप पटेल यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत यासाठी प्रयत्न केला होता.

मृणालताई गोरे उड्‌डाणपुलाचा विस्तार कामात वालभट नदीवरील वि‌द्यमान पुलाचे पाडकाम करून पुनर्बांधणी करण्‍यात आली आहे. तसेच, विद्यमान मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तार कामाशी एकत्रीकरण, अंदाजे ४५० मीटर लांबीच्या (२+२ मार्गिका) पोहोच मार्गाचे सुधारीकरणही करण्‍यात आले आहे. विस्‍तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे. या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (गोरेगाव पूर्व) ते रिलीफ रोड तसेच अंधेरी (पश्चिम) कडे जाणाऱ्या जोड रस्‍त्‍याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे ३० ते ४० मिनिटांचा प्रवास कालावधी कमी होऊन अंदाजे ५ ते १० मिनिटांपर्यत येणार आहे.

मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यास भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्यासह स्‍थानिक आमदार विद्या ठाकूर, स्‍थानिक आमदार हारून खान, हे प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते. तसेच, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्‍थानिक नगरसेवक संदीप पटेल, जिशान मुलतानी, तसेच प्रीती सातम, वर्षा टेंबवलकर, विक्रम राजपूत, हर्ष पटेल, आदी पी दक्षिण विभागातील नगरसेवक व नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रकल्पामुळे मुंबईकरांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार असून वाचलेला वेळ कुटुंबासाठी देता येईल, असे महापौर रितू तावडे म्हणाल्या. भविष्यात कोणत्याही प्रकल्पाला मुदतवाढ किंवा खर्चवाढ मंजूर केली जाणार नाही, असेही त्या म्हणाल्या. उपमहापौर संजय घाडी यांनी पुलाच्या कामात योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे कौतुक करत पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळत असल्याचे सांगितले.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होऊ नये, यादृष्टीने प्रशासनाने कामांची तयारी केली आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे कोणत्याही परिस्थितीत लांबणार नाहीत, याची प्रशासनाने यापुढे काळजी घ्यावी, असे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा