Saturday, June 6, 2026

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक भागातील नाल्यांच्या कामांची पाहणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी मिठी नदीतील गाळ सफाई कामाची बोटीतून फिरून पाहणी केली या पाहणीदरम्यान मिठी नदीत मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि गाळाचे साम्राज्य पाहायला मिळाल्याने प्रशासनाच्या नालेसफाईच्या दाव्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हा गाळ तीन फूट खोल असल्याचे त्यांनी काठी गाळात रूतवून दाखवून दिले.मिठी नदीतील या पाहणीदरम्यान यशवंत किल्लेदार यांना नदीतील अनेक भागांमध्ये पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळ्यांतून जात असल्याचे दिसून आले. नदीपात्रात ठिकठिकाणी प्लास्टिक, थर्माकोल, घरगुती कचरा आणि मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने मिठी नदीचे स्वरूप नदीपेक्षा ‘गटार गंगा’सारखे झाल्याचे चित्र दिसत होते. यामुळे मुसळधार पावसाच्या काळात मुंबईची तुंबई होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

या पाहणीदरम्यान माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना किल्लेदार यांनी मुंबईच्या महापौर आणि पालिका प्रशासनाने नाले सफाई पाहणी करत १०४ टक्के नाले सफाईचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात मिठी नदी गाळाने भरलेली असल्याचे चित्र दाखवत हा सत्ताधाऱ्यांचा सिझनल धंदा असल्याची टीका त्यांनी केली. तसेच प्रशासनावर टीका करताना, दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नालेसफाई केली जाते, असा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता सफाई कामे कितपत प्रभावी झाली आहेत, याबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे सांगितले. मिठी नदीतील गाळ आणि कचरा पावसाळ्यातच नाही तर वर्षभर नियमित केली गेली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

मिठीच्या गाळात रुतली तीन फुट काठी

सर्वच नाल्यांचा कचरा हा मिठी नदीत येतो, मिठी नदीच्या काही भागातील नाले तर अक्षरशः तुडुंब भरलेल्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळाले , हा गाळ एवढा भरला आहे की एखादी काठी आत टाकली तर तीन फुटापर्यंत ती रुतली जाते,असे किल्लेदार यांनी सांगितले.या सर्व नाल्याचा कचरा मिठी नदीतून माहीम समुद्र किनारी येतो त्यामुळे दादर ते माहीमचा समुद्र किनारा कितीही साफ केला तरी तो स्वच्छ होत नाही. स्थायी समितीत आम्हांला नाल्यानविषयी बोलू दिले गेले नाही ही खेदजनक बाब आहे प्रशासनाने प्रत्येक नाल्याच्या तोंडाजवळ कचरा नदीत येऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >