Saturday, June 6, 2026

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली आहे. हे सर्वजण वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याचा आरोप असून, ते जवळपास १५ वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही कारवाई अंधेरी परिसरात एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली. पोलिसांना काही परदेशी नागरिक रोजगाराच्या शोधात परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये चार पुरुष, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्ती बांगलादेशातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी भारतात प्रवेश कसा केला आणि इतक्या वर्षांपासून येथे कसे राहत होते, याचा तपास सध्या सुरू आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती बांगलादेशातील नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांशी नियमित संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी मुंबईत वास्तव्यास असताना कोणत्या ठिकाणी काम केले, कुठे राहिले आणि त्यांना मदत कोणी केली याचीही माहिती गोळा केली जात आहे.

या प्रकरणात केवळ बेकायदेशीर वास्तव्याचाच नव्हे तर त्यांना ओळखपत्रे, निवास किंवा रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांनी यासाठी स्वतंत्र तपास सुरू केला असून विविध कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून चौकशीनंतर आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांची ही कारवाई अवैध स्थलांतराविरोधातील महत्त्वाची मोहीम मानली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >