कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का?… प्रवाशांचा त्रास संपणार का?
मुंबई : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आणि सोयीसुविधा मिळत नसल्याने संप (Best Bus Strike) पुकारला आहे. या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. या प्रकरणी कंपनीने कर्मचाऱ्यांना बेस्टची प्रतिमा मलीन केली असल्याची नोटीस पाठवली. त्यामुळे कर्मचारी अधिक संतापले. आज या संपाचा सलग सहावा दिवस असूनही काही तोडगा न निघाल्याने मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी मध्यस्थी करत बेस्टचा हा प्रश्न पुढील २४ ते ४८ तासांत सुटेल असं आश्वासन दिलं आहे. तसेच संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असंही ते म्हणाले.
मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यात त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे म्हटले आहे, पण त्याचबरोबर त्यांनी लोकांना त्रास झाल्याचेही मान्य केले. ते म्हणाले, हा बेस्टचा संप नसून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आहे. त्यांच्या अनेक मागण्या आहेत पण त्यामुळे लोकांना त्रास झाला. तरीही त्यांच्याही मागण्या बरोबर आहेत. उद्या पुन्हा एक बैठक होणार आहे. त्यांना न्याय मिळावा ही आपल्या सरकारची भूमिका आहे, असं लोढा यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर येण्याची विनंती केली.
यापुढे लोढा म्हणाले की, आपण १ हजार बसेस सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. २४ ते ४८ तासांत हा प्रश्न सुटेल. तरीही कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल. कंत्राटदारांवर कारवाई केली जाणार नाही कारण बसेस बंद नाहीत तर कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे व्यवस्था केली जात आहे. कोणावरही कठोर कारवाई करणार नाही. प्रश्न सोडवण्याची मागणी आहे, त्यावर अधिक लक्ष असेल.
कमी भरुन काढण्यात येईल
मंगल प्रभात लोढा यांनी मत व्यक्त केलं की बेस्ट संपाबाबत जी बातमी आहे, तो बेस्टचा संप नाही. ज्या बसेस वेट लीजवर देण्यात आल्या आहेत, त्या बसेसचे ते ऑपरेटर आहेत. कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे ज्याचा चार ते पाच दिवस लोकांना त्रास झाला आहे. सरकारने वेट लीजवरील ९०० बसेस खाजगी होत्या तिथे बेस्टने आपले कर्मचारी देत वाहतूक पूर्ववत केली आहे. एसटी व स्कूलबस द्वारे ही कमी भरून काढली आहे, अजूनही ४०० बसेस कमी आहेत. ती कमी देखील भरुन काढण्यात येईल.
८ ऑगस्टला पुन्हा होणार चर्चा
किमान वेतनानुसार वेतन द्यावे, असे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. दिवाळी बोनस व इतर मागण्यांवर त्यांची चर्चा झाली. मंगल प्रभात लोढा मंगळवारी ८ ऑगस्टला पुन्हा चर्चा करणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. शिवाय हा बेस्टचा प्रश्न नसून कंत्राटदार व त्यांचे खाजगी कर्मचारी यांचा आहे. त्यांना हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे व पालकमंत्री म्हणून मी मध्यस्थी करत आहे, असं वक्तव्य लोढा यांनी केलं.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra