Friday, April 26, 2024
Homeसाप्ताहिककोलाजHealth care : शरदाचे चांदणे

Health care : शरदाचे चांदणे

वाचक हो, तारखेनुसार २३ नोव्हेंबरपर्यंत खरं तर आपल्याला हा शरद ऋतू अनुभवायला मिळणार आहे. (Health care) आजच्या लेखात पाहूयात, हे चांदणे शीतल कसे अनुभवायचे.

आजपर्यंतच्या लेखमालेत मी ऋतुचर्या, काही विशिष्ट ऋतू, त्यात खाण्या-पिण्यातील पाळावयाची पथ्ये याविषयी लिहिले आहेच. आपल्यासारखे चोखंदळ वाचक देखील त्यापैकी काही गोष्टी समजून घेऊन त्यानुसार स्वत:च्या जीवनशैलीत बदल करण्याचा प्रयत्नही करत असतील, याची मला खात्री आहे आणि अर्थातच समाधानही.

आजच्या लेखात शरद ऋतू आणि त्यात पाळावयाची चर्या याविषयी थोडे वेगळे लिहिणार आहे. आपल्याला वाटेल, आता जेमतेम १५ -२० दिवस, तर राहिले आहेत, मग कशाला हा विषय. पण माझा विश्वास आहे, पूर्ण लेख वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की, बरे झाले हा विषय वाचनीय होता. नमनाला घडाभर तेल पुरे.

मराठी दिनदर्शिकेनुसार अश्विन कार्तिक हे दोन महिने शरद ऋतू असतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबर अखेर एवढा हा दोन महिन्यांचा कालावधी आहे. हे गणित जरी खरे असले तरी खरा शरद ऋतू हवामान किंवा वातावरणातील बदल यानुसार बघायला हवा. जो या वर्षी उशिरा अनुभवायला येतोय. कारण या वर्षी परतीचा पाऊस खूप काळ लांबला. जवळजवळ ऑक्टोबर पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाळा किंवा वर्षा ऋतूच आपण अनुभवला. तुम्ही म्हणाल, याचा आरोग्य विषयाशी संबंध काय? तेच आता पाहूयात. या ठिकाणी दोन विषय महत्त्वाचे.

* एक, दिवसभरात किमान आणि कमाल तापमान यात अजूनही दहा आकड्यांचा फरक आहे. आपल्या शरीराचा देहोष्मा आणि जठराग्नीवर त्याचा परिणाम होतो.

* दुसरी महत्त्वाची गोष्ट, लांबलेला पाऊस. त्यामुळे बाहेरील वातावरणात जसा दमटपणा जात राहिला, तसाच शरीरात क्लेद जास्त काळ कोंडून राहिला. क्लेद म्हणजे शरीरात तयार झालेला मल भाग, खराब झालेला जलांश हा मल विशेष करून रस रक्त या धातूत साठून राहतो. पुढे शरद ऋतूत पित्ताचा प्रकोप काळ असल्याने, रस रक्तात औष्ण्य तैक्ष्ण्य वाढते. रक्त आणि रस बिघडून ते औष्ण्य अभ्यंतर किंवा बाह्य त्वचेत व्यक्त होते. त्यामुळे गोवर, नागीण किंवा विसर्प प्रचंड डोकेदुखी, अशा स्वरूपात आजार होऊ शकतात.

पोटात अचानक दुखणे, घशाशी येणे, ही लक्षणे या शरद ऋतूतील प्रकुपित पित्ताची आहेत, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. योग्य वैद्यकीय सल्ला निश्चित घ्यावा. सध्या आम्ही सर्व डॉक्टर मंडळींवरील पैकी काही ना काही लक्षणे असणाऱ्या अनेक व्यक्तींना चिकित्सा देत आहोत. अचानक उद्भवणारी वरीलपैकी आजार स्वरूप लक्षणे लहान मुले त्याहीपेक्षा मध्यमवयीन स्त्री-पुरुषांमध्ये अधिक दिसत आहेत.

तेव्हा एकदम घडणारा हा वातावरणातील बदल देखील असा घातक नव्हे, पण गंभीर परिणाम घडवू शकतो, हे यावरून लक्षात घेतले पाहिजे. मग यावर आपले काय नियंत्रण? तर आपण बाहेरील वातावरणाचे परिणाम सौम्य होण्यासाठी स्वत:च्या जीवनशैलीतील बदल करून स्वत:चे स्वास्थ्य नक्कीच नियंत्रणात ठेवू शकतो.

* वरीलपैकी लक्षणे दिसली, तर तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घ्यायचा. योग्य पद्धतीने शोधन चिकित्सा आणि त्यासोबत आहार-विहारातील योग्य पथ्य पाळायचे हे मुख्य.

* खाण्या-पिण्याच्या सवयी, जेवण्याच्या पदार्थातील विशिष्ट गोष्टी वर्ज्य करायच्या.

* पित्त वाढवणारे पदार्थ न खाणे विशेषेकरून मासे, गरम मसालेदार पदार्थ टाळले, तर त्याचा उपयोग नक्की होऊ शकेल.

पित्त हे रक्ताच्या आश्रयाने राहते. रक्तातील बिघाड हा अन्नपचनातून मिळणाऱ्या पोषणाशी संबंधित असतो. त्यामुळे पित्त आणि रक्त दोघांना राजासारखे जपायचे.

* सोपे उपाय जेवणातील भाजी, आमटी सर्व गोष्टींच्या फोडणीसाठी साजूक तुपाचा वापर करावा. अन्नातील विष नष्ट करणारे, रक्ताची आम्लता न वाढवणारे, रक्ताला उत्तम ठेवणारा स्नेह म्हणजे तूप होय. आबालवृद्धांना हितकर, पचनाला सहाय्य करणारा आणि ताकद देणारा स्नेह म्हणजे साजुक तूप.

* तेव्हा तुपाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तूप परवडणार कसे? अहो अर्धा किलो लोण्याचे तूप चार माणसांच्या कुटुंबाला १५ दिवस आरामात पुरते. ते वापरायचे कसे, तर भाजी आधी वाफवून किंवा शिजवून घ्यायची आणि वरून खमंग तूप, हिंग, जिरे-धनेपूड अशी फोडणी द्यायची. पदार्थही चविष्ट लागतात.

* फुलका, भाकरी (नाचणी, ज्वारी) यालाही तूप सैंधव किंचित लिंबाचे लोणचे खाल्ले की झाले. पौष्टिक पोटभरीचे खाणे.

* गुलाब किंवा खस घालून दूध घ्यावे. हे सोपे कोल्ड्रींक एकदम मस्त.

* रसायन म्हणून डोंगरी आवळा खाण्यात ठेवावा.

* थंडी पडायला सुरुवात झालीय म्हणून अतिरेकी व्यायाम कटाक्षाने टाळावा. म्हणजे थकवा येणार नाही. चालणे, दीर्घश्वसन असा रोज व्यायाम करावा.

* अभ्यंगासाठी खोबरेल तेल वापरावे.

* आनंद मिळेल असे वाचावे, संगीत ऐकावे.

* Antibiotics antiviral medicines याने सुरुवातीला लाक्षणिक उपशम मिळतो, यात शंका नाही. पण कोविडनंतर असे दिसते आहे, ही औषधे रक्तातील निर्माण झालेले दोष बाहेर काढायला उपयोगी पडत नाहीत. उलट रुग्णाचा त्रास वाढतो. त्यामुळे जीवनशैलीतील बदल योग्य वेळी केल्यास नक्की फायदा होईल. प्रतिकारशक्ती आणि दीर्घकालीन स्वास्थ्यही मिळू शकेल. थोडक्यात, शरदाचे रात्रीचे चांदणे हे नक्कीच आल्हाददायक ठरेल. पुढे येणारा हेमंत ऋतू अधिक तंदुरुस्ती देईल, यात शंका नाही.

-डॉ. लीना राजवाडे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -