Monday, May 6, 2024
Homeमहत्वाची बातमीवेळेत उपचार, सकस आहार; व्यायामामुळे हृदयविकार नियत्रंणात

वेळेत उपचार, सकस आहार; व्यायामामुळे हृदयविकार नियत्रंणात

मानसिक ताणतणावामुळेच हृदयविकारात वाढ

रत्नागिरी (प्रतिनिधी) : धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात व्यक्ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. अतिताणामुळे प्रौढांबरोबर आता तरुण पिढीमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे अतिशय गंभीर असून काही लक्षणे दिसताच वेळेत उपचार घेणे, सकस आहार, व्यायाम आणि मानसिकदृष्ट्या समाधानी राहणे आवश्यक आहे. तरच हृदयविकाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. याबाबत हृदयरोग तज्ज्ञांकडून माहिती घेणे आणि वेळीच तपासणी करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मतिन परकार यांनी व्यक्त केली.

परकार हॉस्पिटल आणि मराठी पत्रकार परिषद यांच्यावतीने येथील गोगटे कॉलेजच्या (कै.) राधाबाई सभागृहात जागतिक हृदयरोग दिनानिमित्त हृदयस्पंदन चर्चासत्र आयोजित केले होते. हृदयाची काळजी कशी घ्यावी या विषयी डॉ. मतिन परकार यांनी तर ऑर्थोपेडिक डॉ. केतन कोदारे यांनी संधिवाताचे शरीरावर होणार परिणाम या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. परकार म्हणाले, मनुष्य प्रगती करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आज मेडिकल सायन्स इतके पुढे गेले आहे की, नवीन तंत्रज्ञानावर आधारित वेदनारहित उपचारही होतात. आज माणूस कितीही धावपळ करत असला तरी मानसिकदृष्ट्या समाधानी असणे गरजेचे आहे. ताणतणावाच्या ओझाखाली तो दबला जात आहे. परिणामी हृदयरोगाचे प्रमाण अगदी ३०-४०शीत वाढत आहे. जितके शक्य आहे, तितकेच माणसाने करावे. सहनशीलतेच्या पलीकडे कोणतीही गोष्ट गेली की, त्यांचा स्फोट होतो. मग ती कोणतीही गोष्ट असू शकते. ॲन्जिओग्राफी, टूडीइको, इसीजी या चाचण्यांबाबतही डॉ. मतिन परकार यांनी या वेळी माहिती दिली.

परकार हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचारदेखील होतात, याचाही लाभ रुग्णांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. जान्हवी पाटील यांनी या तज्ज्ञांशी संवाद साधला. या वेळी आरोग्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून उत्तम काम करणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठान व रत्नागिरी पालिकेचे सफाई कामगार व स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले. हेमंत वणजू, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, जमीर खलके, सतीश पालकर, प्रशांत पवार, केतन पिलणकर, प्रशांत जाधव, समीर शिगवण आदी उपस्थित होते. आभार डॉ. अनुराधा लेले यांनी मानले. सूत्रसंचालन पौर्णिमा साठे यांना केले.

दुग्धजन्य पदार्थांमुळे हाडे होतात मजबुत

दूध प्यायल्यानेच कॅल्शियम वाढत असे नाही. दुग्धजन्य पदार्थ, इतर सकस आहार घेतला तर आपली हाडे अधिक मजूबत होतील. सर्वसामावेशक असा आहार नियमित घेतला पाहिजे. त्याचबरोबर लहान वयात मुलांना कोवळा सूर्यप्रकाश दिला पाहिजे. यातून डी-विटॅमिन मिळते. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे बैठेकामाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाठीचे, मणक्याचे, पायाचे आजार वाढत आहेत. बैठ्या कामातूनही वेळ काढून व्यायाम करणे आवश्यक आहे. फास्टफूडचाही शरीरावर विपरित परिणाम होतो. -डॉ. केतन कोदारे, ऑर्थोपेडिक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -