नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघातील खेळाडू सुनील गावस्कर यांनी थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेतील भारताला मिळालेल्या विजेतेपदाची तुलना १९८३ मधील क्रिकेट विश्वचषक विजयाशी केली आहे. हा क्षण १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या वेळेसारखा होता. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाच्या यशाने देशात बॅडमिंटनमध्ये क्रांती होणार असल्याचेही गावस्कर म्हणाले.
भारताने रविवारी थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. हा क्षण १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकासारखा होता. १९८३ मध्ये भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात क्रिकेट युगाचे सुरुवात झाली. दरम्यान भारताने रविवारी थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे आता भारतात बॅडमिंटन युगाची सुरुवात होणार आहे. भारत बॅडमिंटनमध्येही आपले वर्चस्व प्रस्थापित करणार असल्याचे गावस्कर म्हणाले.
बॅडमिंटन माझा आवडीचा खेळ आहे. जर एकाचवेळी टी-२० आणि बॅडमिंटनचा सामना असेल तर मी बॅडमिंटनचा सामना पाहायला पसंती देतो. बॅडमिंटन खेळ कठीण आहे. या खेळात आपल्या पायांमध्ये ताकद लागत असून आपल्यात धाडस आणि शारीरिक लवचिकता गरजेची असते.