नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Murder) प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणासंदर्भात भाष्य करताना मुंबई पोलिसांच्या तपासाचे संकेत दिले आहेत. दिल्ली आणि मुंबई पोलिसांमध्ये कोणताही असमन्वय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आफताब आपली हत्या करून शरीराचे तुकडे करील, अशी तक्रार श्रद्धाने आधी केली होती. मात्र, महाराष्ट्रात त्यावर काही कारवाई का झाली नाही, याची चौकशी केली जाईल. त्या वेळी तेथे आमचे सरकार नव्हते. मात्र, याला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल,’ असे ते म्हणाले.
दिल्लीत घडलेल्या या हत्याकांडामध्ये आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धाचा १८ मे रोजी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज एका तुकड्याची विल्हेवाट लावत त्याने हे तुकडे जंगलामध्ये फेकून दिले होते. या प्रकरणात रोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्याला कमीत कमी वेळेत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी दिल्ली पोलीस आणि सरकारी वकील पूर्ण प्रयत्न करतील, अशी ग्वाही गृहमंत्री शहा यांनी गुरुवारी दिली. इतकच नाही तर ज्या २०२० च्या मारहाण प्रकरणामध्ये श्रद्धाने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती त्याचाही संदर्भ देत आमित शाह यांनी थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी केली जाणार असल्याचे विधान केले.
आफताब पूनावालाविरोधात श्रद्धाने २०२० मध्ये महाराष्ट्र पोलिसांना दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई का झाली नाही, याचीही चौकशी करण्यात येईल असे ते म्हणाले. “या प्रकरणावर माझे लक्ष आहे. हे कृत्य ज्याने केले आहे, त्याला कायदेशीर मार्गाने कठोर शिक्षा व्हावी, यासाठी दिल्ली पोलीस आणि सरकारी वकील पूर्ण प्रयत्न करतील,’ असे अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले.