Saturday, August 8, 2026

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६६ मृतांची नावे

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६६ मृतांची नावे

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात SIR मोहिमेत मोठी आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख २६ हजार ११३ मतदार असंकलित आढळून आले आहेत. यामध्ये तब्बल १ लाख ४० हजार ७६७ मतदार मयत, तर ६० हजार ८४१ मतदारांची नावे दुबार असल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित दोन लाखांहून अधिक मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत, किंवा त्यांचा शोध बीएलओ आणि त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागलेला नाही. या असंकलित मतदारांचे प्रमाण जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत १२.१८ टक्के आहे. विशेष म्हणजे नगर शहर विधानसभा मतदारसंघात हे प्रमाण सर्वाधिक २२ टक्के, तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी ५.९३ टक्के आहे.

पाच मतदारसंघाचे ‘एसआयआर’चे काम पूर्ण

जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी नगर शहर, कर्जत -जामखेड, श्रीरामपूर, शिर्डी व कोपरगाव या पाच मतदारसंघाचे ‘एसआयआर’चे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, उर्वरित मतदारसंघांचे देखील ९८ टक्के पेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून लवकरच अहिल्यानगर जिल्ह्याचे शंभर टक्के काम पूर्ण होईल असा विश्वास गाढे यांनी व्यक्त केला. दरम्यान ‘एसआयआर’ मोहिमेला निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यात ३८ लाख १० हजार १०२ मतदार

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसआयआर’चे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ३८ लाख १० हजार १०२ मतदार आहेत. त्यापैकी असंकलित मतदार संख्या ४ लाख २६ हजार ११३ इतकी आहे. अशा संकलित मतदारांची यादी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकांनाही (बीएलए) त्या देण्यात आल्या आहेत. या याद्यांसंदर्भात राजकीय पक्षाच्या सहाय्यकांबरोबर बैठका घेण्याच्या सूचनाही बीएलओ यांना देण्यात आल्या आहेत.

दावे, हरकतींठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरची मुदत

मतदान केंद्राचे डिजिटायझेशनचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या याद्या स्थानिक स्तरावर, तालुका पातळीवर व जिल्हा स्तरावरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यासंदर्भात दावे, हरकती दाखल करण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर ही सुधारित मुदत देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत असे दावे व हरकती निकली काढण्यासाठी मुदत असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >