Tuesday, June 9, 2026

मोठी बातमी ! तळेगाव MIDC मध्ये 'मृत्यूचा गॅस'! कंपनीत CO₂ गळतीने दोन कामगारांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! तळेगाव MIDC मध्ये 'मृत्यूचा गॅस'! कंपनीत CO₂ गळतीने दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Pune Breaking News : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात आज एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे (Navlakh Umbare)  येथील शॅफ्लर इंडिया कंपनीमध्ये अचानक झालेल्या कार्बन डायऑक्साइड म्हणजेच CO₂ गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती

सुरुवातीला कंपनीत गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas cylinder explosion) झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्राथमिक तपासात धक्कादायक बाब उघड झाली असून, प्रत्यक्षात कंपनीत कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide) गॅसची गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गळतीने काही क्षणांतच भीषण स्वरूप धारण केले आणि कामगारांच्या जीवावर बेतले.

दोन कुटुंबांचा आधार हिरावला

या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे कंपनी परिसरात एकच गोंधळ उडाला. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली. प्लांटमधील इतर कर्मचाऱ्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. एमआयडीसी सुरक्षा विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.

दरम्यान, ही गॅस गळती नेमकी कशामुळे झाली? यामागे तांत्रिक बिघाड होता का? सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी की मानवी निष्काळजीपणा? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. या सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सुरू करण्यात आला आहे.

दुर्घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

घटनेनंतर तळेगाव एमआयडीसीतील (Talegaon MIDC) इतर उद्योगांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कामगार संघटनांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

एका क्षणात दोन कुटुंबांचा आधार हिरावला गेला, तर तिघेजण मृत्यूशी झुंज देत आहेत. तळेगाव MIDC मधील ही घटना केवळ अपघात नाही, तर औद्योगिक सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर दुर्घटना ठरत आहे. आता या प्रकरणात नेमकी जबाबदारी कुणाची ठरणार? आणि निष्काळजीपणावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >