Monday, May 11, 2026

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ४ हजार ५०० रुपये मिळणार ? ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांसाठी खुशखबर

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ४ हजार ५०० रुपये मिळणार ? ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांसाठी खुशखबर

Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. ज्या महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे, अशा महिलांच्या बँक खात्यात गेल्या तीन महिन्यांचे रखडलेले अनुदान एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर या हालचालींना वेग आला असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊन पात्र महिलांच्या खात्यात थेट ४ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत.(Ladaki Bahin Yojana Update)

महायुती सरकारने जून २०२४ मध्ये ही योजना जाहीर केली होती. सुरुवातीला तब्बल २ कोटी ४७ लाख महिलांनी नोंदणी केली होती. मात्र, अर्जांची छाननी आणि सखोल पडताळणी सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. कुटुंबाचे उत्पन्न, सरकारी नोकरी आणि अन्य निकषांच्या आधारे करण्यात आलेल्या तपासणीत अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले. काही ठिकाणी पुरुषांनीही महिलांच्या नावाने अर्ज केल्याचे समोर आले होते. यामुळे मार्च अखेरपर्यंत ६८ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले होते.(Ladaki Bahin Yojana Update)

शासनाने अपात्र ठरवलेल्या महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मुदत दिली होती. या मुदतीचा फायदा घेत एप्रिल महिन्यात सुमारे १४ लाख महिलांनी आपली कागदपत्रे अद्ययावत केली. त्यामुळे आता अपात्र महिलांची संख्या ५४ लाखांपर्यंत खाली आली असून, या लाडक्या बहिणींना पुन्हा या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर या महिलांना मागील तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकरकमी देण्याबाबत प्रशासन विचार करत आहे. (Ladaki Bahin Yojana Update)

आणखी मुदतवाढ मिळणार?

दुसरीकडे, तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिला अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकलेल्या नाहीत. अशा महिलांनी आणि विविध जिल्ह्यांतील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांनी शासनाकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास आणखी अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. योजनेतील पात्र महिलांना तीन महिन्यांचे रखडलेले हप्ते एकाच वेळी मिळाल्यास आर्थिक अडचणीत असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. तसेच ज्यांनी ई-केवायसी मुदतीत पूर्ण केली आहे, त्यांना रखडलेल्या अनुदानाचे हप्ते मिळण्याची प्रतीक्षा आहे.त्यामुळे आता मुदतवाढ मिळेल का ? यावर अनेक लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्या आहेत. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >