Monday, May 11, 2026

महत्त्वाचे ! गॅस सिलेंडरबाबत नवे नियम, मोठ्या संख्येने कनेक्शन कापले जाणार

महत्त्वाचे ! गॅस सिलेंडरबाबत नवे नियम, मोठ्या संख्येने कनेक्शन कापले जाणार

New rules regarding gas cylinders : इराण अमेरिका युद्धाने अनेक देशात खळबळ उडाली आहे. भारतावर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. इंधन, एलपीजीच्या (LPG) दरात मोठी वाढ होत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्चे तेल आणि एलपीजीची वाहतूक जवळपास ठप्प आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. अशातच आता एलपीजीच्या (LPG)  काही नियमात बदल करण्यात आला.

यामध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, अशा ग्राहकांना एलपीजी सिलिंडरवर अनुदान मिळणार नाही. याचा अर्थ असा आहे की, घरगुती सिलेंडर अधिक पैसे देऊन खरेदी करावे लागणार आहे. तेल कंपन्यांनी देशभरातील दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांची माहिती संकलित केली आहे. याबाबत त्यांना मेसेजही पाठवला जाईल. एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यादरम्यान तेल कंपन्यांकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत.यापूर्वी अनेक ग्राहक 10 लाखांपेक्षाही अधिक उत्पन्न असतानाही सवलतीचा फायदा घेत आहे, मात्र, आता याला आळा बसणार आहे. (New rules regarding gas cylinders)

याव्यतिरिक्त, मृत आणि बनावट खातेधारकांना ओळखले जात आहे. त्यांची चाैकशी करून त्यांचे कनेक्शन्स कायमस्वरूपी बंद केली जात आहेत. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी अनुदानात पारदर्शकता आणण्यासाठी ही मोहिम सुरू केली. उच्च उत्पन्न गट आणि मृत ग्राहकांच्या एलपीजी गॅस जोडण्यांची चौकशी सुरू केली आहे. यामुळे फक्त पात्र आणि या नियमात बसणाऱ्या ग्राहकांनाच अनुदान मिळणार आहे.

दरम्यान, पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे तसेच मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया - युक्रेन लढाईमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत. या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना बचतीचे आवाहन केले आहे. "देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी पुढील वर्षभर घरात कोणतेही कार्यक्रम असले तरी सोने खरेदी करू नका," अशी कळकळीची विनंती पंतप्रधानांनी केली आहे.

तेलंगणा (Telangana) येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी देशाच्या आर्थिक सुरक्षेवर भाष्य केले. "पूर्वी जेव्हा देशावर संकट यायचे, तेव्हा लोक आपले सोने दान करायचे. आज मी तुम्हाला दान मागत नाही, पण देशहितासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केले. पंतप्रधानांनी यावेळी भारताच्या आयातीवर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. "भारताकडे इंधनाच्या मोठ्या विहिरी नाहीत. आपल्याला पेट्रोल आणि डिझेलसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत देशाला इंधन आणि खतांची आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची गरज लागते. सोने खरेदी कमी केल्यास हे चलन वाचवता येईल आणि त्याचा उपयोग देशाच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी होईल," असे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >