Sunday, May 10, 2026

Heat Wave in Maharashtra : उष्णतेचा वाढता कहर! राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; आरोग्य विभाग सतर्क

Heat Wave in Maharashtra : उष्णतेचा वाढता कहर! राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; आरोग्य विभाग सतर्क

राज्यभरात उन्हाचा तडाखा (Heat Wave in Maharashtra) दिवसेंदिवस तीव्र होत असून, त्याचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आरोग्य विभागानेही याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. १ मार्च ते ९ मे या कालावधीत राज्यात उष्माघाताचे तब्बल २२९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आणखी तीन संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० ते ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ७९ उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर नंदुरबारमध्ये २९, नाशिकमध्ये १९, अमरावतीत १२, बुलढाण्यात ११ आणि गडचिरोलीत ८ रुग्णांची नोंद झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, वर्धा, यवतमाळ आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा परिणाम जाणवत आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात राहणाऱ्या ६० वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील ३४ वर्षीय फळविक्रेत्याचाही तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोघेही दीर्घकाळ उन्हात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

तज्ज्ञांच्या मते, उष्माघाताची लक्षणे सुरुवातीला साधी वाटत असली तरी ती जीवघेणी ठरू शकतात. अंगात अशक्तपणा येणे, चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी, अतिप्रमाणात घाम येणे किंवा अचानक शरीराचे तापमान वाढणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे मानली जातात. वेळेत उपचार न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

डॉक्टरांनी नागरिकांना भरपूर पाणी पिण्याचा, दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः मजूर, डिलिव्हरी कर्मचारी, वाहतूक पोलिस, बांधकाम कामगार, शेतकरी तसेच वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष उपचार कक्ष तयार ठेवण्यात आले असून, नागरिकांनी कोणतीही लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >