Monday, May 11, 2026

Suicide Attack in Bannu : पाकिस्तान हादरला! बन्नूमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; १५ पोलिस जवान ठार, अनेक जखमी

Suicide Attack in Bannu : पाकिस्तान हादरला! बन्नूमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; १५ पोलिस जवान ठार, अनेक जखमी

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात शनिवारी उशिरा रात्री भीषण आत्मघाती हल्ला झाला. एका आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन थेट फतेह खेल पोलिस तपासणी नाक्यावर घुसवल्याने प्रचंड स्फोट झाला. या भीषण हल्ल्यात १५ पोलिस जवानांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

स्फोट इतका तीव्र होता की संपूर्ण तपासणी नाका क्षणार्धात उद्ध्वस्त झाला. परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. अनेक जवान ढिगाऱ्याखाली अडकले होते. बचाव पथकाने रात्रभर मोहीम राबवत ढिगाऱ्याखालून जखमी जवानांना बाहेर काढले.

बन्नूचे डीआयजी सज्जाद खान यांनी सांगितले की, स्फोटामुळे मोठे नुकसान झाले असून पोलिस चौकी पूर्णपणे कोसळली आहे. जखमी जवानांना तातडीने जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डीआयजींनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि उपचारांचा आढावा घेतला.

या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जवानांची ओळख पटली असून त्यामध्ये रहमत अयाज, सनाउल्लाह, नियाज अली, हबीब, सादुल्लाह जान, कामरान, नूरुल्लाह, आबिद जानी, इमरान, कलीमुल्लाह, सादिकुल्लाह, मुनीर आलम खान, राहतुल्लाह खान आणि फारूक यांचा समावेश आहे. तर मुजरिम फिरोज, हयातुल्लाह आणि कदरुल्लाह हे जवान जखमी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोटामुळे आसपासच्या घरांचे आणि इमारतींचेही मोठे नुकसान झाले. काही घरांची छप्परे कोसळल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. याआधी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) या संघटनेने बलुचिस्तानातील विविध भागांमध्ये केलेल्या १० हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. खारन, वाशुक, आवारान, केच आणि मस्तुंग भागात सुरक्षा दलांवर हल्ले करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे.

बीएलएफचे प्रवक्ते मेजर ग्वहराम बलुच यांनी सांगितले की, त्यांच्या लढवय्यांनी सैनिकी छावण्या, सुरक्षा ताफे आणि रस्ते बांधकाम कंपनीच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांना लक्ष्य केले. संघटनेने काही ठिकाणी रॉकेट आणि ग्रेनेड लाँचरद्वारे हल्ले केल्याचाही दावा केला आहे. तसेच शस्त्रे जप्त करून सुरक्षा यंत्रणेचे देखरेखीचे कॅमेरे नष्ट केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >