Monday, May 11, 2026

IPL 2026 Mumbai Indians : तिलक वर्माच्या एका चुकीने मुंबईचं स्वप्न भंगलं! नमन धीरसोबतच्या गैरसमजामुळे सामना फिरला, MI प्लेऑफमधून बाहेर

IPL 2026 Mumbai Indians : तिलक वर्माच्या एका चुकीने मुंबईचं स्वप्न भंगलं! नमन धीरसोबतच्या गैरसमजामुळे सामना फिरला, MI प्लेऑफमधून बाहेर

मुंबई : पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या हंगामाचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाला. रायपूरमध्ये झालेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने अंतिम चेंडूवर २ विकेट्स राखून विजय मिळवत मुंबई इंडियन्सला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकलं. आयपीएल २०२६ मधील ५४ व्या सामन्यात आरसीबीने अखेरच्या क्षणी सामना हिसकावत मुंबईच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत १६६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा बचाव करताना मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच प्रभावी मारा करत सामना पूर्णपणे नियंत्रणात ठेवला होता. मात्र, १८ व्या षटकात घडलेल्या एका चुकीने अख्ख्या सामन्याचं चित्र बदललं.

आरसीबीसाठी क्रुणाल पांड्या एकहाती लढत होता. अल्लाह गझनफरच्या गोलंदाजीवर त्याने मोठा फटका मारला. सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या नमन धीरने अप्रतिम प्रयत्न करत चेंडू मैदानात ढकलला. त्याच्याच जवळ तिलक वर्मा उभा होता. पण नमनचा पाय बाउंड्री रोपला लागला असावा, असा समज झाल्याने तिलकने झेल घेण्याचा प्रयत्नच केला नाही.

मात्र रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं की नमनचा पाय रोपला स्पर्श झालाच नव्हता. म्हणजेच तिलकने योग्यवेळी प्रतिक्रिया दिली असती तर क्रुणाल पांड्या त्याच क्षणी बाद झाला असता. हा गैरसमज पाहून नमन धीरही संतापलेला दिसला.

जीवदान मिळाल्यानंतर क्रुणाल पांड्याने त्याच षटकात सलग दोन षटकार ठोकत सामना आरसीबीच्या बाजूने फिरवला. या अतिरिक्त १२ धावाच अखेरीस मुंबईसाठी महागात पडल्या. नंतर तिलक वर्माने क्रुणालचा शानदार झेल घेतला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

शेवटच्या षटकात मुंबईसमोर १५ धावा वाचवण्याचं आव्हान होतं. मात्र, पहिल्यांदाच अंतिम षटक टाकणाऱ्या राज अंगद बावाला दबाव झेपला नाही. त्याने वाइड आणि नो-बॉलसह तब्बल ५ अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे आरसीबीला विजयाचा मार्ग सोपा झाला.

अखेरीस शेवटच्या चेंडूवर रासिख सलामने धाव घेत आरसीबीला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. जर तिलक वर्मा आणि नमन धीर यांच्यात तो गैरसमज झाला नसता, तर सेट झालेला क्रुणाल पांड्या त्याचवेळी बाद झाला असता आणि आरसीबीसमोर शेवटच्या षटकात जवळपास २५ धावांचं कठीण लक्ष्य उभं राहिलं असतं.

मुंबई इंडियन्सच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिलक वर्माच्या त्या एका चुकीवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून, हा क्षणच मुंबईच्या हंगामाचा टर्निंग पॉइंट ठरल्याची चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा