Sunday, May 3, 2026

Riteish Deshmukh reaction on Nasrapur Crime: पुण्यातील नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुख याचा संताप; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

Riteish Deshmukh reaction on Nasrapur Crime: पुण्यातील नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुख याचा संताप; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची ही अमानुष घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख यानेही तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या तो त्याच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे चर्चेत असून, आज तो पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्याने नसरापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

नसरापूर प्रकरणावर बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, या घटनेने मन सुन्न झाले असून प्रचंड संताप येत आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेचा संदर्भ देत सांगितले की, “त्या काळात अशा गुन्ह्यांसाठी चौरंग करण्यासारख्या कठोर शिक्षा दिल्या जात. आज अशा घटना घडतात तेव्हा खूप राग येतो. इतका राग येतो की आपल्या हातात काहीच नाही, अशी असहाय्यता जाणवते.” त्याच्या या वक्तव्याने समाजातील संताप आणि वेदना स्पष्टपणे दिसून येत आहेत.

पुढे तो म्हणाला, “आपण एवढीच अपेक्षा करू शकतो की सरकार, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांनी या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आरोपीवर कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. अशा गुन्हेगारांमध्ये भीती आणि दरारा निर्माण झालाच पाहिजे, जेणेकरून कोणीही असा घृणास्पद विचार करण्याचं धाडस करणार नाही.” तसेच, अशा घटना घडल्यावर जनआक्रोश होणं स्वाभाविक असल्याचं सांगत, फास्टट्रॅक न्यायप्रक्रियेची गरज त्याने अधोरेखित केली.

तो पुढे म्हणाला, “पूर्वीचा काळ आणि आताचा काळ वेगळा आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपल्या देशात संविधान आहे आणि त्यानुसारच निर्णय घ्यावे लागतात. नियमांच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागते. मात्र अशा गंभीर प्रकरणांमध्ये जितक्या लवकर निर्णय घेतले जातील, तितकं समाजासाठी चांगलं ठरेल.” अशा शब्दांत रितेश देशमुख याने आपली भूमिका स्पष्ट करत न्यायव्यवस्थेने वेगाने आणि कठोरतेने पावले उचलण्याची गरज रितेशने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >