Saturday, April 18, 2026

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी आता 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा (एआय) आधार घेतला जाणार आहे. ऊर्जेचे नेटके व्यवस्थापन आणि तांत्रिक बिघाडांचा अंदाज घेण्यासाठी 'एआय'चा प्रभावी वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, यामुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे शनिवारी आयोजित उन्हाळ्यातील 'पीक डिमांड' आणि वीज वितरण व्यवस्थेच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उन्हाळ्याचा वाढता तडाखा आणि आगामी पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असते. ही अडचण दूर करण्यासाठी केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता, ऊर्जा विभागाने तंत्रज्ञानाची जोड द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. विशेषतः मागणीचा अचूक अंदाज वर्तवणे, देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजित करणे आणि संभाव्य तांत्रिक धोके ओळखण्यासाठी 'एआय' यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह टाटा पॉवर, अदानी पॉवर आणि 'बेस्ट'चे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात सध्या रुफटॉप सौर ऊर्जेचा वापर वाढत असल्याने त्याचा मोठा फायदा वीज व्यवस्थापनात होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच, वीजनिर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा आणि पाणी यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने राज्यावर विजेचे संकट ओढवणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.

मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, ही सर्व कामे अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर्सचा वापर अनिवार्य आहे. पावसाळ्यात झाडे पडणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे होणारा खंड टाळण्यासाठी 'एआय'च्या माध्यमातून रिअल-टाइम मॉनिटरिंग करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्राहकांना अखंडित वीज मिळावी यासाठी खासगी आणि सरकारी अशा सर्व वीज कंपन्यांनी समन्वयाने काम करावे, असे आदेशही यावेळी देण्यात आले.

Comments
Add Comment