कर्जत : कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा दगडे ४४७० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या डॉ. स्वाती लाड यांचा पराभव केला. विशेष म्हणजे दगडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. तसेच परिवर्तन विकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून आल्याने त्यांची निर्विवाद सत्ता कर्जत नगरपरिषदेत आली. यामध्ये कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादी-८, उबाठा गट - ४, अपक्ष - १ असे १३ उमेदवार निवडून आले. तर महायुतीमध्ये शिंदे गट - ७, भाजप - १ असे आठ उमेदवार निवडून आले आहेत.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रायगडचे अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनीही मतमोजणी ठिकाणी भेट दिली.
निवडणुकी अगोदर गौरी जोशी, बिनिता घुमरे, रॉली पाल आणि प्रसाद डेरवणकर या उमेदवारांनी पक्ष बदलले ते सर्व या निवडणुकीत पराभूत झाले. एकदा नगराध्यक्ष झाल्यावर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येत नाही. असा कर्जतचा इतिहास आहे. मात्र माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी तो इतिहास खोडून टाकला व त्या १३९७ मताधिक्य घेऊन विजयी झाल्या. या निवडणुकीत महेंद्र चंदन हे सर्वात जास्त म्हणजे १०६७ मताधिक्य घेऊन विजयी झाले. तसेच कर्जत नगर परिषद स्थापन झाल्यापासून प्रत्येक वेळी लाड आणि ओसवाल नावाचे नगरसेवक होते.






