इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. पाकिस्ताननेही मदत साहित्य पाठवून सहकार्य केल्याचा दावा केला आहे. मात्र पाकिस्तानने पाठवलेल्या सर्व मदतीच्या साहित्याची एक्सपायरी झाली होती. सर्व बाद करायच्या वस्तू पाकिस्तानने मदत म्हणून श्रीलंकेला पाठवल्या होत्या. पाकिस्तानच्या या कृत्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली.
याआधी पाकिस्तानच्या दुतावासाने एक्सवर मदत साहित्याचे फोटो शेअर करत, “श्रीलंकेसोबत पाकिस्तान कायम उभा आहे,” असे सांगितले. पण हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी साहित्यावरील तारीख दाखवून पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला. पाठवलेले साहित्य ऑगस्ट २०२२ मध्ये तयार झाले होते आणि त्याची वापरण्याची मुदत दोन वर्षांची होती. म्हणजेच २०२४ च्याआधी हे साहित्य वापरायला हवे होते, परंतु आता त्याची मुदत संपून सव्वा वर्ष उलटले आहे.
पूरग्रस्तांना तातडीने मदत करत असल्याचा दावा पाकिस्तानने केला असला, तरी प्रत्यक्षात कालबाह्य आणि निकृष्ट साहित्य पाठवले. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नामुष्की झाली आहे.दरम्यान, पाकिस्तानचे मदत साहित्य श्रीलंकेत पोहोचण्यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. भारत-पाकिस्तान संबंध ताणलेले असतानाही, मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताने पाकिस्तानी विमानाला आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी दिली. भारताच्या या निर्णयाचे जागतिक स्तरावर कौतुक होत असताना पाकिस्तानने पाठवलेल्या कालबाह्य मदतीमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.






