कल्याण (वार्ताहर) : स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने देशभर शालेय स्पर्धांचे प्रतिवर्षी आयोजन केले जाते. परंतु स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे दोन गट निर्माण होऊन वादविवाद झाल्यामुळे यंदा या स्पर्धा अद्यापपर्यंत सुरू होऊ शकल्या नाहीत.
या संदर्भात कल्याण येथे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आले असता त्यांच्याशी राज्य क्रीडा धोरण समिती सदस्य अविनाश ओंबासे यांनी संवाद साधला. त्यावर त्यांनी दोन्ही गटामध्ये असलेले वादविवाद बाजूला ठेवून स्कूल गेम्स ऑफ इंडियाने एकत्र येऊन स्पर्धा सुरू कराव्यात, नाही तर केंद्र शासन हस्तक्षेप करून लवकरच स्पर्धा सुरू करण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगितले.
तसेच महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणासंदर्भातही ठाकूर यांची भूमिका सकारात्मक आहे. महाराष्ट्रात क्रीडा धोरण आहे, तसेच राष्ट्रीय क्रीडा धोरणा संदर्भात आम्ही नक्कीच विचार करू. त्यासाठी महाराष्ट्रचे क्रीडा धोरण याचा आधार घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल, असे सांगितले.
अनुराग ठाकूर म्हणाले की, केंद्राच्या वतीने क्रीडा क्षेत्रासाठी खूप मोठा निधी दिला जात आहे. केंद्राच्या वतीने स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथे विविध प्रशिक्षण वर्ग आम्ही सुरू केले असून एका खेळाडूला वर्षाला सहा लाख रुपये केंद्र खर्च करत आहे. तसेच अन्य सर्व खेळांसाठी आम्ही प्रशिक्षण वर्ग सुरू करून मिशन ऑलिम्पिक हे आमचे ध्येय आहे ते आम्ही नक्कीच यशस्वी करू. केंद्राच्या वतीने खेळाडूंना प्रशिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, आरएसपी कमांडर माणिलाल शिंपी, बॉल बॅडमिंटनचे राहुल अंकुल, बॉडी बिल्डर संघटनेचे मुकुंद गायधनी, डॉ. सचिन शिंदे, विजय भामरे, मितेश जैन, राहुल खंदारे, पुष्कर पवार आधी क्रीडा क्षेत्रातील संघटक उपस्थित होते.